वर्धा : गत काही दिवसांपासून वातावरन सतत तापत आहे. पारा ४५ अंशाच्यावर गेला आहे. त्यामुळे वर्धेकरांना उन्हाच्या तप्त झळांचा तडाखा सहन करावा लागत आहे. यामुळे शरीरातील पाणी कमी होणे आणि संसर्गजन्य आजार जडण्याचे प्रकार वाढले असून त्याचा विपरित परिणाम आरोग्यावर होत आहे. गत आठवड्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात गार्मीची लाट पसरली आहे. पाऊस येण्याआधी तापमानामध्ये दरवर्षीच वाढ झाल्याची नोंद केली जाते. मात्र यंदाचा ऋतू बदलाचा काळ वर्धेकरांसाठी जास्तच त्रासदायक ठरत आहे. अशा वातावरणामध्ये विषाणू आणि जीवाणूंची वाढ झपाट्याने होत असते. यामुळे सर्दी, पडसे या आजाराने वर्धेकर त्रस्त झाले आहेत. सर्दीच्या बरोबरीनेच दवाखान्यामध्ये येणारे १५ ते २0 टक्के रुग्ण हे घशाला संसर्ग झालेले असतात. उन्हाळ्यामुळे बाहेर फिरताना कोल्डड्रिंक, बर्फाचा गोळा, लस्सी असे पदार्थ खाले जातात. त्याचा परिणाम घशावर होतो. घसा खवखवणे, घशाला सूज येणे अशा तक्रारी यामुळे वाढल्या आहेत. हे सर्व टाळण्यासाठी उन्हाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे किंवा बर्फगोळा यासारखे पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. उन्हामध्ये फिरताना खूप घाम येतो. यामुळे शरीरातील पाणी कमी होते. त्याचबरोबरीने क्षारही कमी होतात. अशावेळी त्वचेवर घाम राहिल्यामुळे त्वचेचे आजार होतात. काही जणांना त्वचेवर लाल पुरळ उठते. लहान मुलांना घामोळ्याचा त्रास वाढत आहे. यामुळे उन्हाळ्यामध्ये स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसातून दोन वेळा अंघोळ करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहे. उन्हामध्ये बाहेर पडताना डोळ्यावर गॉगल वापरणे, तसेच डोके आणि त्वचा झाकणे आवश्यक आहे. तसेच लगेच औषधोपचार करणेही गरजेचे झाले आहे. या उपायातूनच उन्हापासून बचाव करता येतो. (शहर प्रतिनिधी )
वाढत्या तापमानाने रूग्णांच्या संख्येत वाढ
By admin | Updated: May 25, 2014 23:47 IST