देवळी : शेती उत्पादनात वाढ व्हावी, शेतीवर आधारित उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठी जिल्ह्यात ‘आत्मा’ अंतर्गत पुरुषांच्या शेतकरी बतचगटाची स्थापना केली गेली; पण बचतगटातील सदस्यांना प्रशिक्षण दिले जात नसल्याने ही योजना कागदोपत्रीच राबविली जाते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कृषी विभागांतर्गत परिसरातील शेतकऱ्यांच्या बचतगटांची नोंदणी करण्यात आली़ तालुका कृषी कार्यालयात आत्मांतर्गत यासाठी कर्मचारी नेमून दिला आहे. त्यांच्याकडे शेतकरी बचतगटांची नोंद असून अध्यक्ष, सचिवांचे भ्रमणध्वनी क्रमांक व गावांचे पत्ते आहेत; पण तालुका कृषी कार्यालयाद्वारे शेतकऱ्यांशी कुठलाही संपर्क केला जात नाही. शेतकऱ्यांनी कृषी विभागाला एखाद्या योजनेबाबत माहिती विचारल्यास तुम्ही कोणती शेती करू शकता, त्याची रितसर माहिती द्या, प्रशिक्षणाच्या वेळी तुम्हाला बोलविले जाईल, असे उत्तर दिले जाते. शेतकरी हुशार असता तर त्यांना कृषी विभागावर अवलंबून राहावे लागले असते काय, हा प्रश्नच आहे़ शेतकऱ्यांना संपर्क करणे आमचे काम नाही. शेतकऱ्यांनी माहिती आम्हाला विचारावी, अशी बेजबाबदार उत्तरे कृषी विभागाकडून दिली जात आहेत़ गत दोन वर्षांपासून बचतगटांसोबत कृषी विभागाचा संपर्कच नाही. केवळ नागपूर येथे विज्ञान प्रदर्शनाकरिता शेतकऱ्यांना ५० रुपये भरून नेण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांतर्गत आत्मा या उपक्रमात खर्च केला जात आहे़
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याकरिता जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी चालविलेले प्रयोग, फळबाग, शेती लागवड, भरपूर प्रमाणात घेतलेले उत्पन्न अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी घडवून आणणे, त्यांनी नियोजन कसे केले याबाबत माहिती देणे आदी कामे करणे अपेक्षित आहे; पण कृषी विभागाने या परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शनच केले नाही. उलट या विभागाशी संपर्क साधला असता तुम्हाला कशाची आवश्यकता आहे, कोणते प्रशिक्षण घ्यायचे आहे, रेमीम, फळबाग, दुग्ध व्यवसाय याबाबत शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कृषी विभागात संपर्क साधावा, असे सूचविले जाते़ यावरून कृषी विभाग शेतकऱ्यांच्या हिताकरिता किती तत्पर आहे, हे दिसून येते़ जिल्ह्यात बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहे. या बियाण्यांबद्दलही कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गजरेचे आहे. कृषी विभागाच्या योजना पुरुष बचतगटापर्यंत कशा पोहोचतील व आत्मांतर्गत शेतकऱ्यांना कसा लाभ होईल, याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे़(प्रतिनिधी)