पदभरतीकडे कानाडोळा : ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यातआष्टी (शहीद) : राज्य शासनाने बहुतांश तालुका स्थळांवर प्राथमिक आरोग्य केंद्र मोडीत काढून रुग्णालये मंजूर केले. इमारतींची बांधकामे हाती घेतली. रुग्णालयाचा दर्जाही बहाल केला; पण अद्याप पदभरती व अन्य सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. यामुळे ग्रामीण रुग्णालयांची निर्मिती होऊनही आरोग्य केंद्राचाच कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार केवळ येथेच नव्हे तर जिल्ह्यात अन्य ठिकाणीही होत आहे. परिणामी, रुग्णांची गैरसोय होताना दिसते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.आष्टी शहीदभूमीला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. रुग्णालय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले; पण शासनाने कुठल्याही सोयी सुविधा पुरविल्या नाहीत. यामुळे एवढ्या मोठ्या इमारतीमधून प्राथमिक आरोग्य केंद्राचाच कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. येथे औषधी साठा नाही, डॉक्टर नाही, कुठल्याच प्रकारच्या सुविधा नसल्याने जनावरांच्या गोठ्यासम अवस्था झाली आहे. डॉक्टर सतत गैरहजर राहत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र अंतोरा येथे हलविण्यात येणार होते; पण ग्रामीण रुग्णालयाला कुठल्याच प्रकारच्या सुविधा नसल्याने नाजुक स्थिती निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तालुक्याच्या स्थळी ग्रामीण भागातून रुग्ण येतात. या रुग्णांना योग्य औषधोपचार व सुविधा मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरून औषधी विकत आणावी लागत आहे. तालुका आरोग्य अधिकारी पद रिक्त असल्याने प्रभारी अधिकारी धुरा सांभाळत आहे. नियमित अधिकारी मिळावे म्हणून जि.प. सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला; पण अधिकाऱ्यांची पदे शासनाकडून भरण्यात न आल्याने नियमित अधिकारी देणे शक्य होत नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयाला शासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. येथील रुग्णालयाला दोन वर्षांपूर्वीच या सुविधा मिळणे अपेक्षित होते; पण काहीही झाले नाही. शासनाने ग्रामीण रुग्णालयाचा केवळ दर्जा बहाल केला; पण त्यासाठी लागणारा फौजफाटा अद्याप दिला नाही. यामुळे योग्य रुग्णसेवाच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. दोन कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरू ठेवून शासनानेच रुग्णसेवेचा हशा उडविल्याचे दिसून येत आहे. २०११ पासून मंजूर रुग्णालयाचे बांधकाम प्रथम वादाच्या भोवऱ्यात अडकले. कसेबसे बांधकाम पूर्ण झाले तर अद्याप अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली नाही. रुग्णालयाला लागणाऱ्या तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. औषधींचाही तुटवडा असल्याने ग्रामस्थांना भुर्दंड सोसावा लागत आहे. याकडे लक्ष देत रुग्णालयाला मूर्तरूप देण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)
रुग्णालय झाले; पण सुविधाच नाही
By admin | Updated: April 20, 2016 02:22 IST