अंकित गोयल : महाआरोग्य अभियानांतर्गत रक्तदान, अपंग तपासणी, आयुष निदान व उपचार शिबिरांना सुरूवातवर्धा : आरोग्य सेवा हिच खरी देशसेवा आणि समाजसेवा आहे. या सेवेच्या माध्यमातून समाजाचे कल्याण होते. समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने नि:स्वार्थ भावनेने शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचेल याबाबत पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले.जिल्हा सामान्य रुग्णालयात महाआरोग्य अभियानांतर्गत आयुष निदान व उपचार, राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व अपंग तपासणी शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सामान्य रुग्णालयासचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अनूपम हिवलेकर, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. घेवडे उपस्थित होते.आरोग्य व पोलीस सेवा एकमेकांना पूरक कार्य करीत असते. या सेवेतून समाजाचे कल्याण होते. आरोग्य सेवा ही देशसेवा आहे. या सेवेचे व्रत ज्यांनी अंगिकारले, त्याचे नेहमीच कौतुक वाटते. त्यांच्या या व्रतामुळे तळागाळातील व्यक्तींपासून सर्वांचेच कल्याण होते. आयुष्य वाचते. प्रत्येकाला जीवनदान देण्याचे कार्य आरोग्य सेवेतून होते, असेही गोयल यांनी सांगितले. डॉ. मडावी यांनी १ फेब्रुवारीपासून महाआरोग्य अभियान जिल्ह्यात राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रक्तदान, अपंग तपासणी, आयुष निदान व उपचार तथा राजीव गांधी योजनेंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाआरोग्य शिबिरांतून गावापासून शहरातील विविध आरोग्य केंद्र, रुग्णालयात आरोग्य सेवांचा लाभ देण्यात येत आहे. या शिबिरांचा प्रत्येक गरजूने लाभ घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. चव्हाण यांनी १३ मार्चपर्यंत चालणाऱ्या महाआरोग्य अभियान शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. घेवडे यांनीही जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ जनतेला देण्यात येतो. जिल्हा रुग्णालय रुग्णांच्या सेवेत उपलब्ध असून येथे कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. आयुष विभागाच्या डॉ. अश्विनी डोने यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आयुष विभागात पारंपरिक चिकित्सा पद्धतीबाबत माहिती दिली. यात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग व निसर्गोपचार, पंचकर्म व बिलतदबीर अंतर्गत रोगनिदान व उपचार याबाबत माहिती देऊन या चिकित्सक पद्धतीचा उपयोग रुग्णांनी करावा, असे सांगितले. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत विविध रुग्णांना या योजनेचा लाभ दिला जातो. जिल्ह्यातील चार रुग्णालयांत या योजनेचा लाभ देण्यात येत असून ही योजना पेपर व कॅशलेस असल्याने शेतकऱ्यांसह सामान्य जनतेसाठी उपयोगी आहे. ९७१ आजारांवर या योजनेंतर्गत उपचार करून रोगाचे निदान नि:शुक्ल केले जात असल्याचे डॉ. मेश्राम यांनी सांगितले.दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. संचालन मॅसन यांनी केले तर आभार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया यांनी मानले. यानंतर मान्यवरांनी आयुष निदान व उपचार विभागाला भेट देत रुग्णांशी संवाद साधला. कार्यक्रमास सामान्य रुग्णालयाच्या परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, मेट्रन पुनसे, डॉ. आकरे, डॉ. रहाटे, जि.प. आरोग्यचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
आरोग्य सेवा हीच खरी देश आणि समाजसेवा होय
By admin | Updated: February 10, 2016 02:47 IST