दुधाचे भाव भिडणार गगणाला : ज्वारीच्या अल्प पेऱ्याचाही परिणामवर्धा : अपूरा पाऊस आणि काही पिकांकडे शेतकऱ्यांनी फिरविलेली पाठ यामुळे गत काही वर्षांत चारा टंचाईने डोके वर काढले आहे. यावर्षी गुरांसाठी वैरण उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांसह गोपालकांना वैरणासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गुरांसाठी जिल्ह्यात चाराडेपो सुरू करावे, अशी मागणीही या अनुषंगाने समोर येत आहे.गुरांसाठी आवश्यक असलेले वैरण शोधूनही मिळत नसल्याने बाजारपेठेत मिळणारे पशुखाद्य विकत घेण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. हिरवे वैरण उपलब्ध नसल्याने दुधाच्या उत्पादनात लक्षणीय घट होऊन दुग्धजन्य पदार्थाचे भाव वाढू लागले आहेत. परिसरातील अनेक पशुपालक शेतकरी वैरणाच्या शोधात भटकंती करताना दिसून येतात. वन्यप्राण्यांसह पक्ष्यांमुळे काहीही हाती येत नसल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढल्याचे दिसते. परिसरातील बारा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून या व्यवसायाची शेतकऱ्यांनी निवड केली. त्यावेळी गुरांना लागणारे वैरण मुबलक उपलब्ध होते. जंगलाचे प्रमाण अधिक होते. जंगली श्वापदांचे प्रमाण कमी होते. आता गुरांचे प्रमाण भरपूर असताना वैरणाचे प्रमाण नगण्य आहे. ज्वारीचा पेरा नगन्य असल्याने कडबा मिळत नाही. तूर, सोयाबीन व गहु या पिकांपासून मिळणारे वैरण निसर्गाच्या लहरीपणामुळे दुरापास्त झाले आहे. यावर्षी सोयाबीनची सवंगणी व मळणी न झाल्याने ते वैरणच उपयोगात आले नाही. गारपिटीमुळे गव्हाचे पीक हातून गेले. नगण्य प्रमाणात गव्हांडा हाती लागला. तुरीचे वैरणही हाती आले; पण प्रत्येक शेतकऱ्याला जनावरांची भुक भागविण्याकरिता आवश्यक असल्याने त्या वैरणाची विक्री केली जात नाही. उन्हाळ्याच्या दिवसात गुरांना हिरवा चारा हवा असतो. यासाठी ऊसाच्या पाला उपयोगात आणला जात होता; पण आता ऊसाचेही क्षेत्र घटत असल्याने पाला मिळणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकरी स्वत:च्या शेतात कड्याळू वा मक्याची पेरणी करतात. यासाठीही ओलिताची सोय गरजेची आहे. शिवाय रानडुकरही यावर ताव मारतात. यामुळे चारा मिळणेच कठीण झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
चाऱ्यासाठी गोपालक, शेतकऱ्यांची भटकंती
By admin | Updated: April 20, 2016 02:23 IST