वर्धा : दहावीचा निकाल लागताच अकरावी प्रवशाची धावपळ सुरू होते. बहुतांश प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तंत्रशिक्षणाकडे वळतात तर उर्वरित विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य व कला शाखेत अकरावीला प्रवेशित होतात. यावर्षी दहावीचे १५ हजार ३८३ नियमित व ७१० जुन्या अभ्यासक्रमातील असे १६ हजार ०९३ अकरावी आणि तंत्रशिक्षणामध्ये प्रवेश घेणार आहेत. यासाठी तंत्रशिक्षण वगळता तीनही शाखा मिळून जिल्ह्यात १५ हजार २३६ जागा उपलब्ध राहणार आहेत. जिल्ह्यात ११६ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांमध्ये २११ तुकड्या मंजूर आहेत. जिल्ह्यातील महाविद्यालयांत विज्ञान शाखेमध्ये ६० तुकड्या मंजूर असून ५ हजार ३०९ विद्यार्थी क्षमता आहे. कला शाखेच्या ११७ तुकड्यांमध्ये ७ हजार ४२० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. वाणिज्य शाखेच्या १६ तुकड्या असून १ हजार ११८ विद्यार्थी क्षमता तर वाणिज्य संयुक्तच्या १८ तुकड्या असून १ हजार ३९० विद्यार्थी क्षमता आहे. १६ हजार ९३ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या १५ हजार २३६ जागा असून जिल्ह्यातील पॉलीटेक्निक महाविद्यालयातील जागाही शिल्लक राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत मुबलक जागा असल्याने प्रवेशाकरिता धावपळ होणार नसल्याचे दिसते. उलट काही महाविद्यालयांना आपल्या तुकड्या टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळवावे लागतील, असेच आकड्यांवरून दिसून येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
अकरावी प्रवेशासाठी तुकड्या सज्ज
By admin | Updated: June 18, 2014 00:19 IST