वर्धा : रेल्वेतून चार इसम उशीतून गांजाची तस्करी करीत असून ते वर्धेत तो विकण्याकरिता आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी शास्त्री चौकातील पेट्रोल पंपालगत सापळा रचून या चारही जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून ४४ हजार ९६५ रुपयांचा गांजा व इतर साहित्य असा एकूण ५० हजार ८०० रुपयांचा मुद्दोमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.शेख सलमान शेख सलीम (२०) रा. नूर नगर, वलगाव रोड, अब्दूल वसीम अब्दूल कयूम (२६), रा. पठाणचौक रोड, लालखडी, शेख आसिफ शेख यूसूफ (१९) रा. राहमतनगर, शेख शकील शेख माजीद (१६) रा. यास्मीन नगर, जि. अमरावती अशी अटकेत असलेल्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस सुत्रानुसार, रेल्वेतून चार इसम गांजाची वाहतूक करीत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून शास्त्री चौक परिसरात पेट्रोलपंपाजवळ सापळा रचून संशीत असलेल्या चारही इसमांना ताब्यात घेत यांना विचारणा करून अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ गांजा मिळून आला. या ओल्या गांजाचे वजन ८ किलो ९९३ ग्रॅम असून त्याची किंमत ४४ हजार ९६५ रुपये आहे. या चौघांवर शहर ठाण्यात कलम २०, एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये नोंद करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक एस.बी. कडू, सादिक शेख, संजय देवरकर, नरेंद्र डहाके, मनोज नांदूरकर, सलाम कुरेशी, गजानन कठाणे, किशोर आपतूरकर, कुणाल हिवसे, तुषार भूते, सचिन खैरकार यांनी केली.(प्रतिनिधी)
गांजाची वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक
By admin | Updated: February 19, 2016 02:24 IST