सेंद्रिय खतांचा केला वापर : एकरभरात २०० क्विंटल उत्पन्न होण्याचा अंदाजअमोल सोटे आष्टी (श.)पारंपरिक पिकांना फाटा देत आष्टी(श) येथील परशुराम पवार या शेतकऱ्यांने बटाट्याची शेती करून त्याचे यशस्वी उत्पादन घेऊन दाखविले. नियोजनबद्ध शेती केल्यास कुठल्याही पिकातून चांगले उत्पादन घेता येते असा आदर्श त्यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आहे. सोबातच आष्टी तालुक्यात बटाटा पीक चांगल्या प्रकारे घेतले जाऊ शकते हे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांची शेती पाहण्यासाठी गावोगावचे शेतकरी येत आहे.परशुराम पवार यांच्याकडे एकूण ३.५ एकर शेती आहे. ते अप्पर वर्धा विभागात नोकरीवर होते. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी चांगल्या प्रकारे शेती करण्याची इच्छा परिवारास बोलून दआखविली. पत्नी भारती, मुलगा अमोल आणि सुन कविता यांनी त्यांना सहकार्य केले. डोंगरगाव मौजात येत असलेल्या त्यांच्या शेतात पाण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम विहीर बांधली. त्यानंतर त्यांनी गहू, चना, भूईमुग आदी पीक घेऊन शेतीच्या सुपिकतेची चाचणी घेतली. चांगले उत्पादन झाल्याने त्यांना सुपिकतेची खात्री पटली. यानंतर त्यांनी अनेकांचे तांत्रिक मार्गदर्शन घेत बटाट्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. सरी वरंबा पद्धतीने लागवड केली. नियमित फवारणी व खतांना फाटा देत सेंद्रीय खते दिली. शेणखत भरपूर प्रमाणात दिले. पाण्याच्या पाळी वरचेवर दिल्यामुळे त्याचा फायदा होत गेला. झाडांची चांगली वाढ झाली असून पिकाला ४० दिवसाचा कालावधी पूर्ण झाला. २० दिवसानी पीक काढणीवर येणार आहे. एका झाडाला मोठ्या आकाराचे १० ते १२ बटाटे लागले आहे. एकरभरात २०० क्विंटल बटाटा होण्याचा असा मानस पवार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. उर्वरित अडीच एकरात त्यांनी भूईमुंगाची पेरणी केली आहे. संपूर्ण शेताला सिंचनाची सुसज्ज व्यवस्था केली आहे. शेतात परशुराम, पत्नी भारती, मुलगा अमोल दिवसरात्र मेहनत करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल कृषी विभागाने घेण्याची गरज ते व्यक्त करीत आहेत.
नियोजन व परिश्रमातून फुलविली बटाट्याची शेती
By admin | Updated: February 11, 2016 02:36 IST