पिंपळखुटा : पेरणीचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून शेतीकरिता लागणारे बियाणे, खते असे साहित्य बाजारपेठेत विक्रीला आहे. एकीकडे शेती साहित्याची मुबलकता असली तरी, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने बियाणे खरेदीकरिता शेतकरी बांधव कृषी केंद्राकडे फिरकले नसल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.मागील हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टीसह गारपीटचा सामना करावा लागला. यामुळे हाती आलेले पीक गमवावे लागले. या अस्मानी संकटातून शेतकरी सावरत नाही तोच उत्पन्नाला मिळालेला कमी भाव, त्यावर झालेला खर्च या सर्वांच्या वजाबाकीत शेतकऱ्यांंच्या हाती काहीच लागले नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खूपच खालावली. शेतीवर केलेल्या खर्चाचा मोबदलाही मिळाला नसल्याने शेतकरी कर्जाच्या गर्तेत अडकला. यामुळे आगामी हंगामात पेरणी करण्यासाठी लागणारे बियाणे कसे खरेदी करावी हाच प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.यातच बियाणे व खताच्या किमतीत वाढ झाली. शिवाय शेतमजुरीही वाढल्याने शेतकऱ्यांसमोर या समस्या आवासून आहे. बियाणे खरेदीकरिता शेतकऱ्यांना घरच्या लक्ष्मीचे दागीने गहान ठेवण्याची वेळ आली आहे. बँकेचे कर्ज थकीत झाल्याने यावर्षी सावकाराचा उंबरठा झिजवावा लागणार असल्याचे वास्तव आहे. शेतकऱ्यांना खत, बियाणे उधार मिळणे कठीन झाले आहे. सततच्या नापिकीने त्रस्त झालेला शेतकरी यंदाचा हंगाम चांगला येईल या आशेन कामाला लागला आहे.(वार्ताहर)
खरिपाकरिता शेतकरी चिंतेत
By admin | Updated: June 15, 2014 23:44 IST