वर्धा कृऊबा समिती : व्यापाऱ्यांच्या मर्जीने लिलाववर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसागणिक आवक वाढत असून येथे असलेल्या अपुऱ्या साधन सामग्रीमुळे शेतकऱ्यांना रात्र बाजार समितीच्या यार्डवरच काढावी लागत आहे. सकाळी आपल्या गावाहून आलेल्या शेतकऱ्यांच्या साहित्याचे वेळीच मोजमाप करण्याऐवजी येथे व्यापाऱ्यांच्या मर्जीने लिलाव होत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या व्यवस्थापकीय मंडळाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामात आवक वाढली आहे. या तुलनेत येथे असलेले हमाल व मोजमाप करण्याकरिता आवश्यक काट्यांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. सकाळी बाजारात उत्पन्न घेवून आलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या मोजमापाकरिता रात्र काढावी लागते. शिवाय बाजार समितीत शेतकऱ्यांंच्या मुक्कामाकरिता कुठलीही सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना बाजारात आणलेल्या त्यांच्या उत्पादनावरच झोपावे लागत आहे.(प्रतिनिधी) लिलाव ११ वाजता करण्याची मागणीवर्धा बाजार समितीत आवक वाढत आहे. यामुळे येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास लिलाव झाल्यास शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकून घर गाठणे साईचे होईल. ज्या शेतकऱ्याचे एक किंवा दोन क्विंटल धान्य आहे अशा शेतकऱ्यांना येथे रात्र काढण्याची गरज पडणार नसल्याच्या प्रतिक्रीया काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिल्या. काही शेतकरी स्वत:च्या गाडीने येतात. ते काटा होताच निघून जातात. मात्र त्यांच्याकडे अशी सोय नाही त्या शेतकऱ्यांना रात्री हॉल्टींग बस शिवाय पर्याय नसतो. ती बस आठ वाजेपर्यंत असते. कधी वेळेवर रक्कम मिळाल्यास या बसने गेलेल्या शेतकऱ्याला लुटारूंची भीती असते. यामुळे लिलावाची वेळ बदलल्यास शेतकऱ्यांना सोईचे होईल, असे बोलले जात आहे.
शेतकऱ्यांची रात्र बाजारात
By admin | Updated: April 30, 2016 02:18 IST