गिरड : अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. गिरड सहवनपरिक्षेत्रात घडली. ईश्वर अर्जुन महातळे (७०) रा. जासा (घोन्सा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२ वाजताच्या सुमारास अर्जून महातळे हे त्यांच्या बैलांना पाणी पाजण्यासाठी गेला होते. यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बाब शेतात असलेला त्यांचा भाऊ गोविंदा यांच्या लक्षात येताच त्यान आरडाओरड करीत गावात धुम ठोकली. याची माहिती त्याने गावकऱ्यांना दिली. माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत अस्वल त्या मृताजवळ बसले होते. नागरिकांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु अस्वल जागचे हलण्यास तयार नव्हते. घटनेची माहिती गिरड सहवनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम.ओ. राऊत व मंगळूरचे जी.बी.पाटील, गिरडचे ठाणेदार एस.डी. जाधव यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अस्वलाला जंगलात पिटाळून लावले. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)
अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
By admin | Updated: February 15, 2015 01:45 IST