गिरड : शेतात पाणी ओलण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला चढविला. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. जखमी शेतकऱ्याचे नाव निळकंठ नन्नावरे असे आहे.प्राप्त माहितीनुसार, फरीदपूर येथील निळकंठ मंगलू नन्नावरे (५५) हा गावातील सुधीर धानोरे यांच्या शेतात पाणी ओलण्याकरिता गेला होता. पाणी ओलत असताना शेतात अचानक रानडुकरांचा कळप आला. या कळपाला हाकलण्याचा प्रयत्न केला असता कळपात समोर असलेल्या म्होरक्या डुकराने निळकंठ याच्यावर हल्ला चढविला. डुकराचा हल्ला होताच त्याने आराडाओरड केली असता गावातील सुरेश गजभे, संजय घोडमारे, रूपेश गेडाम यांनी शेताकडे धाव घेतल्याने रानडुकराच्या कळपाने पळ काढला. या तिघांनी जखमी निळकंठला प्रथम ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. शेतकऱ्याला शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)
रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर
By admin | Updated: July 14, 2014 02:27 IST