आशुतोष सलील : सामाजिक न्याय भवनात कार्यशाळा वर्धा : सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्यांची प्रभावीपणे माध्यमांनी प्रसिद्धी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे एक दिवसीय पत्रकारांच्या कार्यशाळेच्या उद्घाटन कर्यक्रमात ते बोलत होते. कार्यशाळेला आंबेडकरी विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक भाऊ लोखंडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक मोहन राठोड, माजी प्राचार्य सुभाष खंडारे, मानसोपचार तज्ज्ञ प्रा. राजा आकाश, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, मिलींद फुलझेले, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, विशेष समाज कल्याण अधिकारी दीपा हेरोळे, बार्टीच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी डोंगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एम. खळीकर आदींची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रातील योगदान अमुल्य असल्याचे सांगितले. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत लोखंडे म्हणाले, डॉ. आंबेडकरांच्य विचारामुळे गरीब व श्रीमंतीतील दरी कमी होऊन एका समानतेवर राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी दोन्ही वर्गातील लोकांना समान न्याय दिला. माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक मोहन राठोड म्हणाले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांच्या कार्यशाळा पार पडत असल्याचे सांगितले. डॉ. सुभाष खंडारे यांनी जेम्स आॅगस्ट हिकीपासून ते पत्रकार डॉ. आंबेडकरांपर्यंतचा इतिहास सविस्तर उलगडविला. वंचित, दुर्बल, मागास समाजाच्या उद्धारासाठी जाणत्या माध्यमांनी पुढाकार घेऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची आवश्यकजा विषद केली. यावेळी प्रा. राजा आकाश, फुलझेले, भारती यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले तर आभार देशमुख यांनी मानले.(प्रतिनिधी)
सामाजिक न्याय विभागाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा
By admin | Updated: April 17, 2016 02:05 IST