वर्धा : जिल्ह्यात पाण्याची समस्या भेडसावू नये, पाण्याची बचत व्हावी यासाठी सर्वांनी पाण्याचे सुनियोजन करून पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी केले.पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेवर आधारित परिसंवादाचे आयोजन विकास भवन येथे करण्याम आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, वरिष्ठ भू-वैज्ञानिक अधिकारी नितीन महाजन, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील, भूयार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता डी.एल. बोरकर, उपविभागीय अभियंता अजय बेले आदी उपस्थित होते.यावेळी माहिती देताना चौधरी म्हणाले की, प्रायोगिक तत्वावर १०० गावांची निवड अभ्यासपूर्णरीत्या करण्यात आलेली आहे़ उपस्थित सर्व गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांनी पाण्याची समस्या उद्धवणार नाही, यासाठी या कार्यशाळेचा सर्वांना उपयोग होणार आहे. सकारात्मक दृष्टीने सर्वांनीच यासाठी पुढाकार घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी सुनियोजनबद्धपणे गावातील प्रत्येक नागरिकाला याबाबत अवगत करून साक्षर करा, असे आवाहनही त्यांनी केले़ यावेळी बेले, महाजन, बोरकर आणि पवार यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेनंतर उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंचांनी उमरी (मेघे) येथे प्रत्यक्ष जाऊन योजनेची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन संपदा अर्धापूरकर यांनी केले तर आभार वहाने यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)
पाणी बचतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
By admin | Updated: November 11, 2014 22:45 IST