वर्धा : दिवसेंदिवस कमी होत असलेला मुलींचा जन्मदर वाढविण्याकरिता शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात मध्यंतरी बेटी बचाव अभियान राबविण्यात आले. या अभिनाची सर्वत्र जनजागृती करण्यात आली. असे असतानाही गत दहा महिन्यात वर्धेत मुलींच्या तुलनेत मुलांचीच संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. वर्धेत जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय व सहा ग्रामीण रुग्णालयातून आरोग्य सेवेचे कार्य सुरू आहे. वर्धा जिल्ह्यात १ एप्रिल २०१४ ते ३१ जानेवारी २०१५ या दहा महिन्याच्या काळात शासकीय आकडेवारी पाहली असता यात मुलींची संख्या कमीच असल्याचे दिसून आले आहे. यात मुलांच्या तुलनेत २३१ मुली कमी असल्याचे दिसून आले आहे. या दहा महिन्यात १० हजार ६२३ प्रसुती झाली. यात पाच हजार १९६ मुली तर पाच हजार ४२७ मुलांचा जन्म झाला. कमी होत असलेली ही आकडेवारी चिंतेचा विषय ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)
बेटी बचाव अभियानानंतरही मुलींचा जन्मदर कमीच
By admin | Updated: February 15, 2015 01:45 IST