गिरड : विद्युत खांबावर झालेला बिघाड दुरुस्त करण्याची जबाबदारी विजतंत्रीची असताना ते खांबावर न चढता गावातील काही अप्रशिक्षित तरुणांना खांबावर चढवून तांत्रिक बिगाड दुरुस्त करुन घेतल्या जात असल्याचा प्रकार सध्या गिरड परिसरात सुरू आहे. या प्रकारात एखाद्या तरुणाचा घात झाला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. युवकांकडून शेतकऱ्याला १५० ते २०० रु.चा भुर्दंड बसत आहे. यातूनच गावातील शेतकऱ्यांनी वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना घेराव घातला होता. यानंतर आश्वासनानंतर दखल घेतली पुरवठा सुरळीत झाला पण हे अनधिकृत वीजतंत्री कायमच आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. रबी हंगाम सुरू झाला. पेरणी करण्यास पाण्याची गरज आहे. नियमित पुरवठा होत नाही. पंप चालत नाही. पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी स्थानिक कार्यालयात तक्रारी नोंदविल्या तरीही दखल घेतल्या जात नाही. काही लाईनमन तर दिवसभर दारू पिऊन कार्यालयात राहतात. काही मोजके लाईनमन इमानदारीने काम करतात त्यांची कदर होत नाही. काही प्रकरणे पोलिसातही गेली आहेत. येथे कार्यरत विजतंत्री लाईनमन खांबावर चढत नाही. गावातील बेरोजगार युवकांना हाताशी धरून बिगाड दुरुस्त करतात. खांबावर चढणारे तरूण प्रशिक्षित नसतात. विजतंत्री त्यांना सोबत नेऊन किंवा त्यांनाच पाठवून बिगाड दुरुस्त करुन घेतात. शेतकऱ्यांना तात्काळ बिगाड दुरुस्त करायचा असल्यास ते सुद्धा खासगी तरूणांकडून करुन घेतात. तरूण खांबावर चढण्यापूर्वी १०० ते २०० रु. शेतकऱ्यांकडून वसूल करतात. नियमानुसार वीज वितरणच्या खांबावर खासगी व्यक्तीला चढता येत नाही. हे काम वीज वितरणच्या लाईनमननेच कोणताही मोबदला न घेता करणे अत्यावश्यक आहे. पण येथे बरेचशे लाईनमन असक्षम व दारुडे असून त्यांना खांबावर चढताच येत नाही. यांची तक्रार कनिष्ठ अभियंता पालनकर यांनी वरिष्ठांकडे करुनही दखल घेतल्या जात नाही. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट असून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण हा प्रश्न शेतकरी व गावकरी यांना पडला आहे.(वार्ताहर)
विजेच्या दुरुस्तीचे काम तरुणांच्या खांद्यावर
By admin | Updated: November 15, 2014 22:53 IST