विजय माहुरे सेलूखरीप हंगाम धोक्याचा ठरला. शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्न जागीच गेले. यात शासनाच्यावतीने सर्व्हे करून त्याचा अहवाल सादर केला. यानुसार शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे. असे असताना सेलूच्या बाजारेपेठेत मात्र कापसाच्या आवकीने तीन वर्षाचे आकडे मोडीत काढले. त्यामुळे येथे येणारा कापूस कुठला, अशी चर्चा जोर धरत आहे.तालुक्यात कापसाचे क्षेत्रफळ व ओलिताचा कापूस पिकविणाऱ्यांची संख्या अधिक असताना यावर्षी प्रथमच फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात कापसाची उलंगवाडी झाली. असे असताना मे महिन्यापर्यंत कापूस बाजारपेठे येतो. पण सेलूच्या बाजारपेठेत आर्थिक वर्षाचा विचार करता अजूनही ४५ दिवस शिल्लक आहेत. असे असताना गत वर्षीच्या तुलनेत ६० हजार क्विंटलने कापसाची आवक वाढली आहे.सेलू तालुक्यातील बहुतांश कापूस आंजी, खरांगणा व आर्वीच्या बाजारपेठेत विक्रीस जातो. असे असतानाही सेलूच्या बाजारपेठेत कापूस खरेदी वाढली आहे. ही खरेदी कशामुळे हा चर्चेचा विषय ठरत आहे. २ फेब्रुवारीपर्यंत सेलूच्या उपबाजारपेठेत हिंगणी व जुवाडी येथील कापूस संकलन केंद्रावर ९० हजार क्विंटलच्यावर कापूस खरेदी झाली. नगदी चुकारा हे कारण येथे असल्याचे शेतकरी सांगतात तर सेलू येथील दोन खरेदी केंद्रावर १ लाख क्विंटल कापूस खरेदी झाली. पणन महासंघाला फक्त ५ हजार क्विंटलवर समाधान मानावे लागले.एकीएकडे दरवर्षीच्यास तुलनेत कापूस पिकावर आलेल्या संकटामुळे अर्धेच उत्पन्न हातात असल्याचे चित्र आहे. असे असतानाही तीन वर्षाच्या तुलनेत कापसाची आवक वाढली, हे मात्र न उलनगडणारे कोडे ठरत आहे. कापसाची वाढलेली आवक मात्र दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना विचार करायला लावणारी बाब ठरत आहे. अजूनही शेतात बराच कापूस पडून आहे. यामुळे यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उत्पादनात घट तरी कापसाची आवक वाढली
By admin | Updated: February 15, 2015 01:44 IST