रोहणा : वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका ग्राहकांना अनेकदा सहन करावा लागतो. रोहणा व परिसरातील घरगुती वीज ग्राहक आणि कृषी पंपधारक शेतकरी यामुळे त्रस्त झाले आहे. मात्र यात सुधारणा होत नसल्याचा प्रत्यय गौरखेडा येथील घटनेवरुन पुन्हा एकदा आला.रोहणानजीकच्या गौरखेडा येथील रमेश भोना बुरघाटे यांनी वीज देयकाचा भरणा केला असताना त्यांच्याकडील वीजपूरवठा खंडीत करण्यात आला. यातून विद्युत वितरण कंपनीने ग्राहकाला तुघलकी कारभाराचा प्रत्यय दिला आहे. याची तक्रार केली असून वीज पुरवठा पुर्ववत करण्याची मागणी केली आहे. गलथान कारभारामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या विद्युत वितरण कंपनीकडून याबाबत कआळजी घेतली जात नसल्याने ग्राहकात नाराजी व्यक्त होत आहे. रोहणा येथील उपकेंद्राच कारभार गोंधळाचा असून ग्राहकांना कमी वापारापेक्षा जादा देयकाची आकारणी करणे, रिडींग न घेता देयक आकारणी, वीज देयकाच्या नियोजित तारखेत वितरण न करणे यामुळे ग्राहकांना विनाकारण दंडाचा भुर्दंड करावा लागणे असे प्रकार होतात. याबाबी येथील ग्राहकांसाठी नित्याच्याच झाल्या आहेत. गौरखेडा येथील रमेश बुरघाटे यांच्या घरगुती वापराचे देयक ८ आॅगस्ट पर्यंत भरायचे होते. त्यांनी २६० रुपयाचे हे देयक तारखेत भरले. यानंतर विद्युत वितरण कंपनीने २२ आॅगस्टला थकीत देयकाच्या सबबीवरुन त्यांचाकडील वीजपूरवठा खंडीत केला. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करुन खंडित केलेला पुरवठा पुर्ववत करण्याची मागणी केली आहे.(वार्ताहर)
वीज देयकाचा भरणा करुनही पुरवठा खंडित
By admin | Updated: August 26, 2014 00:10 IST