आर्वी : तालुक्यातील दहेगाव(मु.) येथे गत तीन चार दिवसांपासून १५ ते २० गावकऱ्यांना हगवण व उलट्यांसह मळमळ आधीने ग्रासले आहे. या गावात दररोज तीन ते पाच जणांना या रोगाची लागण होत आहे. यावर येथील ग्रामीण आरोग्य पथकाकडून कुठलीही उपाय योजना करण्यात आली नसल्याने रुग्ण संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.आरोग्य विभागाच्यावतीने गावात होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे नमूने तपासणीकरिता पाठविले असल्याचे सांगण्यात आले आहे.आर्वी तालुक्यातील दहेगाव(मु.) हे दीड हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात असलेल्या नदीकाठावरील विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची पाईलाईन कुठेतरी लिकेज असण्याची शक्यता आहे. हे दूषित पाणी गावकऱ्यांच्या पिण्यात येत असल्याने रोज दोन तीन जणांना या गावात हगवण, उलट्यांचा त्रास होत आहे. यावर ग्रामीण प्र्राथमिक आरोग्य केंद्रांना या गावातील वाढत्या लागणीवर तातडीने उपाय करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गत महिन्यात याच गावात पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे पाईप लिकेज झाल्याने गावकऱ्यांना डायरियाची लागण झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती सध्या गावात सुरू असून गावकरी या रोगाने भयग्रस्त झाले आहेत. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देत कारवाई करण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)
दहेगाव (मु.) येथे डायरियाची साथ
By admin | Updated: February 15, 2015 01:43 IST