विजय माहुरे सेलूजिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या सात किमी अंतरावर असलेला सेलू तालुका विकासाचे स्वप्न पाहत आहे; पण अद्यापही गावाचा विकास होताना दिसत नाही़ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले; पण विकासाचे स्वप्न दिवास्वप्नच ठरणार काय, असा प्रश्न तालुक्यातील नागरिक उपस्थित करीत आहे़ राजकीय व प्रशासकीय उदासिनतेमुळे सध्या सेलू तालुका भकास झाल्याचे चित्र असून याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़राजकीयदृष्ट्या या तालुक्याचा जिल्हास्तरावर दबदबा कायम राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून तीन जिल्ह्याचे प्रतिनिधित्व आमदार वसंत वानखेडे तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद विजय जयस्वाल, चित्रा रणनवरे व प्रकाश करनाके यांना मिळाले आहे. वर्धा विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या या तालुक्यातील राजकीय नेत्याला विधानसभेत आमदार म्हणून स्थान मिळाले नसले तरी तालुक्यातील मतदारांचा कौल निर्णायक राहिला आहे़ असे असले तरी पांदण रस्त्याच्या कामाला गत दहा वर्षांपूर्वी दिलेली गती प्रतिनिधी बदलताच मंदावल्याचे चित्र आहे़ सेलू तालुक्यात तीन कारखाने उभे राहिले होते़ काही वर्षे युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली; पण माशी कुठे शिंकली, हे कळण्यास मार्ग नाही़ हिंगणी, केळझर व जामणीचा कारखाना बंद पडला. जामणीचा कारखाना अखेर विकला गेला. आज तो सुरू असला तरी शेतकऱ्यांच्या भांडवलाच प्रश्न आजही कायम आहे. हिंगणी व केळझरचा कारखाना आजही बंद स्थितीत असून ते पुन्हा सुरू होतील काय, हा प्रश्न कायम आहे़ राजकीय पुढारी याबाबत स्तब्ध दिसून येतात़ बागायती शेतीचा तालुका असला तरी अद्याप ‘केळी प्रक्रिया उद्योग’ उभा राहिलेला नाही. सध्या तर केळीच्या बागाही या तालुक्यातून हरवल्याचेच चित्र आहे़ विकासापासून कोसोदूर असलेल्या सेलू तालुक्यात अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे़ अनेक सरकारे बदलली; पण अद्यापही तालुक्याला विकासाचा सूर गवसला नाही. याला राजकीय उदासिनता तर कारणीभूत नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे़ निवडणुकाच्या वेळी आश्वासने दिली जातात; पण त्या समस्या सुटतच नसल्याचे वास्तव आहे़शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होते की नाही, याची कारणमिमांसा होणे गरजेचे झाले आहे. हागणदारी मुक्त तालुका, निर्मलग्राम, सिंचन विहीर, स्वच्छता अभियान आजही दूर गेल्याचे चित्र आहे. तालुक्याच्या विकासाला गती देणारा लोकप्रतिनिधी हवा, असे तालुकावासियांना वाटणे स्वाभाविक आहे. सेलू हे गाव आता शहर झाले आहे. नगरपंचायत म्हणून उदयास आले खरे; पण दोन महिने होऊनही मुख्याधिकारी नाही़ यामुळे अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत़ तालुक्यातील व्यक्ती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्यांचीच सत्ता व त्यांचेच आमदार आहे़ मग, सेलू तालुक्यावर बुरे दिन का, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत़ पंचायत समिती ही ग्रामीण भागाच्या अडचणी दूर करण्यासाठी असते; पण येथे तक्रारींचा निपटारा करण्यासाठीही चालढकल करण्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. यामुळे विकासाला खिळ बसत असल्याने तालुक्याचा विकास दिवास्वप्नच ठरत आहे.जंगलांचा वेढा, सिंचन प्रकल्प, तीर्थक्षेत्र, नागपूर-वर्धा राज्य मार्ग, दळणवळणाची साधने, भौगोलिक रचना सर्वच अनुकूल असताना सेलू तालुक्याचा विकास रखडल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करतात़ नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचे शहर जवळ असताना सेलूचा विकास होत नसल्याने रोजगाराचा प्रश्न बिकट झाला आहे़ पर्यटन विकासाकरिता शासन प्रयत्नशील आहे़ बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला; पण ज्या तालुक्यात हे अभयारण्य आहे, तथील विकासाला फाटाच दिला जात असल्याचे दिसते़ लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे लक्ष देत सेलूच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत़
विकसित ‘सेलू तालुका’ ठरतोय ‘मृगजळ’
By admin | Updated: May 13, 2015 01:54 IST