हिंगणघाट : येथील नगर परिषद ही ‘ब’ वर्ग असून जिल्ह्यातील एक मोठी नगरपरिषद आहे. या नगरपरिषदेमध्ये स्थायी कर्मचाऱ्यांसोबतच २८० रोजंदारी कर्मचारी ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून स्थायी करावे किंवा त्यांचे नवनिर्मित असलेल्या पालिकेत समोजन करावे या मागणीचे निवदेन माजी आमदार राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सादर केले.येथील पालिकेतील अस्थायी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत अनेकवेळा मागणी झाली. या बाबत नगरपरिषदेने शासनाकडे वारंवार प्रस्ताव सादर केलेत. नगरपालिकेत गत २० वर्षांपासून शासनाच्या स्तरावर एकही पद भर्तीची मंजुरी मिळालेली नाही. परिणामी आजही रोजंदारी कर्मचारी अल्पशा वेतनावर कार्यरत आहेत. नगरपरिषदेची आर्थिक स्थिती बेताचीआहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन पालिकेच्या निधीतून होत असल्याने वर्षाकाठी आर्थिक बोझा सहन करावा लागत आहे. पर्यायाने विकासात्मक कामे निधीतून करणे अशक्य आहे. वास्तविकतेत रोजंदारी कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षांपासून आंदोलनाच्या माध्मातून या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला व ते आजही प्रयत्नशील आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रोजंदारी कर्मचाऱ्यांचा स्थायीत्वाचा प्रश्न निकाली काढणे सोयीचे होईल, असे निवेदन माजी आमदार राजू तिमांडे व हिंगणघाट नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार तसेच न.पा.कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश अडेपवार, सचिव नरेश पिंपळशेंडे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान तसेच उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना दिले.(तालुका प्रतिनिधी)
हिंगणघाट पालिकेतील अस्थायी कामगारांना स्थायी करण्याची मागणी
By admin | Updated: June 16, 2014 23:38 IST