वर्धा : वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे कपाशी व सोयाबीनचे पीक गेले. आत चन्याचे पिकही वन्य प्राणी नष्ट करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. वायफड येथील शेतकऱ्याचे वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. वायफड येथील विजय किसना ठोंबरे यांचे डोरली गाव शिवारात शेत आहे. यापैकी तीन एकर क्षेत्रात त्यांनी चणा पिकाची लागवड केली होती. परिश्रम घेऊन पिकाला पाणी दिले. पीक घाट्यावर येईपर्यंत रखवाली केली; पण शेतात शिरलेल्या रोही व रानडुकरांच्या कळपाने पिकाची नासाडी केली. शेतातील बहुतांश पीक तुडविले गेले. घाट्यांसह पालाही प्राण्यांनी फस्त केला. आता जमिनीवर केवळ काड्या शिल्लक राहिल्या आहेत. शेताच्या कोणत्याच भागात घाट्या असलेले झाडे शिल्लक दिसत नाही. परिणामी, ठोंबरे या शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह महसूल विभागाला दिली. वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे केवळ ठोंबरेच नव्हे तर लोनसावळी, डोरली, कुरझडी, दहेगाव, आंबोडा, आमला, धामणगाव, तिगाव, रिठ येथील पिकांचे नुकसान झाले. सर्व्हे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
वन्य प्राण्यांच्या हैदोसाने चना पीक उद्ध्वस्त
By admin | Updated: February 12, 2016 02:39 IST