पावसाची हुलकावणी : शेतकरी चिंतातुर; सोयाबीनचा पेरा नाही, केवळ कपाशीची लागवड वर्धा : रोहिणीपाठोपाठ मृगही कोरडा जात आहे. रोहिणीत पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांना मृगसरींची प्रतीक्षा होती. मात्र मृगात पाहिजे तशा सरी कोसळल्या नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. आता त्याची आशा रविवारपासून सुरू झालेल्या आद्रावर आली आहे. आद्राचा पहिला दिवस कोरडाच जाण्याची चिन्हे दिवसभर होती. येथेही पावसाने जर डोळे वटारले तर यंदा जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे संकट आहे.गत हंगामात जून महिन्यापासूनच पावसाची हजेरी लागली होती. यामुळे जून महिन्याच्या अखेरीपर्यंत जिल्ह्यात ८० टक्के पेरा आटोपला होता. गत वर्षी चांगले उत्पन्न होईल अशी आशा असताना प्रारंभीपासून आलेला पाऊस अखेरीस अतिवृष्टी ठरला. यामुळे हातचे उत्पन्न गेले. यंदा मात्र या उलट परिस्थिती आहे. जून महिना संपण्याच्या मार्गावर असून पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे यंदा कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना अशी शंका वर्तविली जात आहे. मृगाच्या सुरुवातील पावसाच्या थोड्या सरी पडल्याने शेतकऱ्याने त्याच्या कामाला गती दिली. आज चांगला पाऊस येईल, उद्या येईल या आशेत बळीराज असताना रोज आकाशात ढग दाटून येतात व सायंकाळी निघून जातात. पाऊस मात्र येत नाही. यामुळे त्याची चिंता आणखीच वाढली आहे.मृग नक्षत्रात खरीपाची बऱ्यापैकी पेरणी ओटोपते. यंदा मात्र तसे चित्र नाही. मृगाच्या प्रारंभी आलेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी कपाशी लागवड केली. तर काहींनी पावसाच्या प्रतीक्षेत शेतात कपाशीची बियाणे टाकून ठेवली आहेत. ज्यांनी पहिल्या पावसात कपाशीची लागवड केली त्यांची कपाशी उगविली असून पावसाअभावी ती करपण्याच्या मार्गावर आली आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पेऱ्याला अद्याप सुरुवात झाली नाही. मृगात पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावधानी बाळगत अद्याप सोयाबीनचा पेरा टाळला. यामुळे सोयाबीनची पेरणी आद्रा नक्षत्रातच होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यातही आद्रा कोरडा गेला तर खरीप शेतकऱ्यांच्या हातचा गेल्यातच आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
मृग कोरडाच, बळीराजाची आर्द्रावर भिस्त
By admin | Updated: June 23, 2014 00:13 IST