अपघाताची शक्यता : परिसरात अवैध व्यवसायांना उधाण नाचणगाव : येथून हैद्राबाद-भोपाळ हा राष्ट्रीय महामार्ग जातो. तसेच नागपूर-कारंजा-औरंगाबाद हा राज्यमार्ग नाचणगाव येथून गेल्याने अयोध्यानगर येथे चौफुली तयार झाली आहे. या दोन्ही मार्गाने मोठ्या प्रमाणावर जडवाहतूक होते. महामार्ग असल्याने येथून वाहने भरधाव जातात. या चौफुलीवर पथदिवे किंवा हायमास्ट नसल्याने रात्रीला काळोख असतो. ही बाब अपघाताचे कारण ठरत आहे. पुलगाव-नाचणगाव तसेच परिसरातील नागरिक या मार्गाचा वापर वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर करतात. काही शाळा या मार्गावर असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यांना अपघाताचा धोका असतो. येथे भीषण अपघात झाले आहे. काळोखामुळे वाहनचालकांना समोरून एकाएकी वाहन आल्यास काहीच दिसत नाही. त्यामुळे येथे अपघात होतात. येथे पथदिवे लावल्यास वाहन चालकांना समोरील वाहन नजरेस पडेल आणि अपघात टाळता येईल. चौफुलीवर पथदिवे लावल्यास अपघाताच्या घटना कमी होऊ शकतात. येथील वाहतूक सुरळीत होण्यास यामुळे मदत होईल. या मार्गावर दररोज हजारो वाहने धावतात. येथील वाहनांची संख्या पाहता चौफुलीवर पथदिवे लावण्याची गरज परिसरातील नागरिक व्यक्त करतात.(वार्ताहर)
अयोध्यानगर चौफुलीवर काळोख
By admin | Updated: January 5, 2017 00:40 IST