वर्धा : शेतकर्यांनी त्यांच्या शेतातील मशागत आटोपली असून त्याला आता पावसाच्या सरींची प्रतीक्षा लागली आहे. मृग नक्षत्र प्रारंभ झाले असून येत्या दिवसात केव्हाही पाऊस येण्याची शक्यता बळावली आहे. मान्सून केरळात दाखल झाला आहे. तो महाराष्ट्राच्या वाटेवर आहे. शेतकर्यांनी पेरणीकरिता आवश्यक सर्व साहित्याची जुळवाजुळव करणे सुरू केले असून त्यांना आर्थिकतेचा फटका बसत आहे. पारा ४७ अंशावर पोहोचल्याने केवळ बळीराजा नाही तर सर्वानाच मृगाच्या सरींची प्रतीक्षा लागली आहे. गत इखरीप हंगामासोबतच रब्बी हंगामही शेतकर्यांचा हातचा गेला. या दोन्ही हंगामात निसर्गाने दगा दिल्याने उत्पन्न झाले नाही. हाता, तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला, तरी निराश न होता सन २0१४-१५ या खरीप हंगामाची तयारी जिल्ह्यातील शेतकर्यांनी केली आहे. बँकेच्या कर्जाची थकबाकी असतानाही पैशाची जुळवाजुळव करून बळीराजा बाजारपेठेत बी- बियाण्यांच्या खरेदीसाठी पोहोचला. गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोयाबीन बियाण्यांच्या किमती दुप्पट झाल्या. मागील वर्षी सोयाबीनची ३0 किलोची बॅग १४00 रुपयात होती. चांगल्या प्रतिची बॅग १८0५ रुपयांत मिळत होती. या वर्षी तीच चांगल्या प्रतीची बॅग २६00 रुपयांची झाली तर सर्वसाधारण कंपनीचे बियाणे २१00 रुपयांवर पोहोचले.सोयाबीनच्या बियाण्यात ७00 ते एक हजार रुपयांची दरवाढ झाली आहे. परिणामी शेतकर्यांनी घरगुती सोयाबीन बियाण्याचा वापर करण्याची मानसिक तयारी सुरू केली आहे. कपाशीचे बियाणे मागील वर्षीच्याच भावात याहीवर्षी बाजारपेठेत उपलब्ध आहे. ४५0 ग्रॅम वजनाची पिशवी ८00 ते ९३0 रुपये या दरात मिळत आहे. बियाण्यांमध्ये न झालेली वाढ हेच शेतकर्याला तात्पुरते समाधान देते. तुरीच्या बियाण्यात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली तशीच वाढ मूग, उडीद व तीळ बियाण्यातही झालेली आहे. या बियाण्यांची बाजारपेठेतून खरेदी करण्याऐवजी घरी असलेल्याच बियाण्यांचा वापर शेतकरी करण्याची शक्यता जास्त प्रमाणात जाणवत असल्याचे कृषी साहित्य विक्रेत्यांकडून सांगण्यात येते. अशात कृषी विभागानेही शेतकर्यांना घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ही बियाणे वापरताना त्याची चाचणी करण्याच्या सूचना देखील विभागाने केल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)
मशागत संपली; पावसाची वाट
By admin | Updated: June 9, 2014 23:47 IST