अरुण फाळके कारंजा (घाडगे)तालुक्यात असलेल्या ग्राहक संख्येच्या तुलनेत वीज बिल भरण्याकरिता केवळ एकच केंद्र असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वीज बिल भरण्याकरिता आलेल्या नागरिकांना यात दिवस वाया घालावा लागतो. शहरात आणखी चार केंद्र उभारण्याची मागणी स्थानिक विभागाच्यावतीने वरिष्ठ कार्यालयाकडे केली असली तरी त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे.१०१ गावातील एक लाख २० हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्यात विद्युत ग्राहकांची संख्या २४ हजार ८०० आहे. या संपूर्ण विद्युत ग्राहकांना बील भरण्यासाठी तालुका स्थळी कारंजाला यावे लागते. हे एकमेव विद्युत संकलन केंद्र असल्यामुळे सर्वांना येथे येवून वीज बिल भरावे लागते. यात ग्राहकांचा संपूर्ण दिवस वाया जातो. ज्येष्ठ नागरिकांनाही तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. अनेक ग्राहकांना चक्कर येवून खाली पडल्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत. तालुक्यातील ग्राहकांनी आणखी किमान चार संकलन केंद्र मिळावे, यासाठी वीजवितरण कंपनीकडे मागणी केली. मात्र या मागणीकडे कंपनी दुर्लक्ष करीत असून ग्राहकांची फटफजिती होत आहे.कारंजा तालुक्यात ७ हजार ५०० कृषी पंप ग्राहक, १६ हजार ६५० घरगुती व वाणिज्य ग्राहक, ३३० औद्योगिक व वॉटर सप्लाय असे एकूण २४ हजार ८०० ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये वितरण कंपनी विद्युत बिलापोटी वसुली करते. दोन वर्षांपूर्वी ठाणेगाव, कन्नमवारग्राम, सारवाडी येथील सहकारी बँकात वीज देयक भरण्याची सुविधा होती. कारंजा वीजवितरण कंपनीच्या कार्यालयातही वीजबिले स्वीकारली जायची. आता हे सर्व केंद्र बंद झाल्यामुळे नागरिकांना ४० कि़मी. लांबून ग्राहकांना बिल भरण्याकरिता कारंजाला येथे यावे लागत आहे. पूर्ण दिवस, श्रम व येण्याजाण्याचा पैसा वाया जातो. ज्येष्ठ नागरिकांनाही रांगेत उभे राहावे लागते. पाऊस, ऊन्ह, थंडीचा मारा सहन करावा लागतो.
२४,८०० ग्राहकांची एकाच केंद्रावर गर्दी
By admin | Updated: March 15, 2015 01:54 IST