आर्वी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर सीसीआयची कापूस खरेदी बंद आहे़ सदर यार्ड काळ्या यादीत टाकल्याची माहिती आहे. यामुळे स्पर्धा निर्माण झाली असून व्यापाऱ्यांनी शासकीय हमीभावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची सुमारे आठ कोटी रुपयांनी लूट केल्याचे उघड झाले़ यामुळे सीसीआयची खरेदी त्वरित सुरू करावी, अशी मागणी प्रहार युवा संघटना व शेतकऱ्यांनी केली आहे़शासनाने कापसाचे हमीभाव प्रतीक्विंटल ४०५० रुपये ठरविला आहे़ कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया त्याच दराने कापसाची खरेदी करीत आहे; पण येथे सीसीआयची खरेदी नाही. परिणामी, संघटित असलेले व्यापारी याचा फायदा घेत असल्याचे दिसते़ केवळ ३८०० ते ३८५० रुपये दराने कापसाची खरेदी करीत आहेत़ शिवाय दीड टक्क्याने बटावसुद्धा कापत आहेत़ यात क्विंटलमागे ३०० रुपये कापूस उत्पादकांची आर्थिक लूट व्यापाऱ्यांद्वारे होत आहे. शेतकरी कापूस पिकविण्यासाठी राबत असला तरी त्याला क्विंटलमागे ३०० रुपये वाचत नाहीत; पण व्यापारी घरबसल्या क्विंटलमागे ३०० रुपये कमवित आहे़ ही कापूस उत्पादकांची थट्टा म्हणावी लागेल़ कापूस खरेदी सुरू झाल्यापासून आर्वी यार्डवर सुमारे २ लाख ५० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ३०० रुपये क्विंटलप्रमाणे हिशेब केल्यास ७ कोटी ५० लाख रुपयांवर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट केल्याची निदर्शनास येते़ कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाचे अधिकारी आणि व्यापारी यांच्यातील आर्थिक संबंधांमुळे ही लूट सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सुरू असलेली आर्थिक लूट थांबविण्यासाठी त्वरित सीसीआयची कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी प्रहार संघटनेद्वारे करण्यात आली आहे़ अन्यथा प्रहार संघटनेच्यावतीने आंदोलन उभारण्यात येईल, इशारा जिल्हाप्रमुख बाळा जगताप यांनी दिला आहे़ याबाबत तहसीलदारांना निवेदनही सादर करण्यात आले आहे़ शिष्टमंडळात प्रशांत खंडाळ, सुधीर जाचक, धीरज सारसर, प्रशांत रामटेके, राहुल गोठाणे, राजू आगरकर, धीरज गीरडकर, अंकुश गोटेफोटे, विशाल पुनसे, सूरज इरपाचे, माणिक निमकर, सुनील देशमुख, महेश खोडके, बाल्या राऊत, संतोष गौळकर, सैय्यद जुनेद यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.(तालुका प्रतिनिधी)व्यापाऱ्यांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदीशासनाने कापसाचा हमीभाव ४०५० रुपये क्विंटल जाहीर केला़ सीसीआय त्याच दराने कापसाची खरेदी करीत आहे; पण येथील सीसीआयची खरेदी बंद आहे़ यामुळे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत आहे़ केवळ ३८०० ते ३८५० रुपये दराने कापूस खरेदी करीत असून ३०० रुपये बटाव कपात होत आहे़ यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ हमीभावापेक्षा अधिक दर मिळणे अपेक्षित असताना अल्प किमतीत पांढरे सोने विकावे लागत आहे़
कापूस उत्पादकांची आठ कोटींनी लूट
By admin | Updated: February 15, 2015 01:47 IST