वर्धा : पालिकेद्वारे शहरात सर्वत्र कचरा साठविण्यासाठी कचरा कंटेनर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनाही सोयीचे झाले आहे. पण रामनगरातील हनुमान मंदिराच्या मागे असलेल्या जैन मंदिर परिसरातील कचरा कंटेनर पूर्णत: दारूच्या बाटल्यांनीच भरून राहात असल्याचे वास्तव समोर येत आहे.जिल्ह्यात दारूबंदी असतानाही येथेच सर्वात जास्त दारू मिळणे हे एखाद्या आश्चर्याशिवाय कमी नाही. त्यातही अगदी सहजपणे वर्धेत दारू उपलब्ध होत असल्याचे वास्तव आहे. या काही वर्षात वर्धा शहरातील रामनगर भागात दारूचे पाट वाहात आहेत. बिअर बारला बंदी असल्याने येथील काही घरांमध्येच होम बार सुरू झाले आहे. या घरांमध्येच बारसारखी सर्व सुविधा पुरविण्यात येत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. दिवसभर गोळा झालेल्या दारूच्या बाटल्या रात्रीला जैन मंदिराजवळ असलेल्या कचरा कंटेनरमध्ये टाकल्या जातात. दररोज हा प्रकार सुरू असल्याने आज या कंटेनरमध्ये केवळ दारूच्या बाटल्याच निदर्शनास पडतात. विशेष म्हणजे येथून हाकेच्या अंतरावर रामनगर पोलीस ठाणे आहे. असे असतानाही अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने याला पोलिसांची मूकसंमती तर नाही ना असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)
कचरा कंटेनरमध्ये दारूच्या बाटल्यांचाच खच
By admin | Updated: June 19, 2016 01:49 IST