वर्धा : बांधकाम विभागाच्यावतीने तळेगाव (टालाटुले) येथे रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या रस्त्याकरीता कडेला असलेली घरे पाडण्यात येणार असल्याचे गावकर्यांना सांगण्यात आले आहे. ही कारवाई अन्यायकारक असून ती रोखण्यात यावी, या मागणीसाठी गावकर्यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंत्याला साकडे घातले. यावर जोपर्यंत पूर्ण चौकशी करण्यात येणार नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे आश्वासन कार्यकारी अभियंत्याने ग्रामस्थांना दिल्यावर त्यांनी आंदोलन मागे घेतले. रस्त्याच्या कडेला असलेली घरे १९६६ मध्ये गावठाण नकाशानुसार मंजूर करण्यात आली आहेत. ही घरे अतिक्रमित नाहीत तर वडीलोपार्जित आहेत. असे असले तरी महसूल व बांधकाम विभागाच्यावतीने जागेचे मोजमाप करून मार्किंग करण्यात आले आहे़ यात बहुतांश नागरिकांची घरे पूर्णत:च जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे़ शिवाय २४ मे रोजी गावात दवंडी फिरवून २६ मे रोजी रस्त्याच्या कडेला असलेली घरे पाडण्यात येणार असल्याची दवंडी गावात देण्यात आली. यामुळे भयभित झालेल्या गावकर्यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालया गाठले़ जिल्हा परिषद सदस्य मिलिंद भेंडे यांच्यासह ग्रामस्थांनी कार्यालयावर मोर्चाच काढला़ यावेळी कार्यकरी अभियंता राजीव गायकवाड, उपअभियंता अय्यर, चंद्रशेखर गिरी यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली़ या चर्चेच्यावेळी गावकर्यांनी अभियंत्यांना रस्ता विस्तारीकरणात रस्त्याच्या कडेला वडीलोपार्जित असलेली घरे पूर्णत: मोडकळीस निघणार आहेत. यामुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ येणार असल्याचे सांगितले. गावकर्यांच्या या समस्या ऐकून अभियंता गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनावर जोपर्यंत पूर्ण चौकशी होणार नाही, तोपर्यंत एकही घर पडणार नाही, असे सांगितले़ यावर समाधान मानत गावकर्यांनी अभियंत्याच्या कार्यालयातून काढता पाय घेतला. आता पुन्हा मोजणी व चौकशी कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़(प्रतिनिधी)
तळेगाववासीयांचे बांधकाम अभियंत्यांना साकडे
By admin | Updated: May 27, 2014 01:05 IST