मागणी : भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका वर्धा : आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतच्या मार्गावर एकही गतिरोधक नाही. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. त्यामुळे भरधाव वाहने धावतात. या मार्गावर शाळा असल्याने वाहनांच्या गतिला आवर घालणे गरजेचे ठरते आहे. येथे किरकोळ अपघाताच्या घटना होतात. केरकळवाडी चौकात गतिरोधक लावण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवाश्यांनी केली आहे.या मागणीचे निवेदन नागरिकांनी जिल्हाधिकारी, वर्धा नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिले. आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतचा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून अरूंद असल्याने वाहतुकीला अडचणीचा ठरत होता. येथील नागरिकांनी वारंवार मागणी केल्यावर रस्ता रूंदीकरण करुन रस्त्यावर दुभाजक लावण्यात आले. मात्र येथील चौकात गतिरोधक लावले नाही. या मार्गावर शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांना रस्ता ओलांडून जावे लागते. रस्ता ओलांडत असताना वाहनांच्या गतीमुळे अपघाताचा धोका असतो. ३ फेब्रुवारीला झालेल्या घटनेत मोठी दुर्घटना टळली. गतिरोधक नसल्याने वाहन भरधाव येतात. केळकरवाडी चौकात चारही दिशेने वाहने येत असल्याने वाहनांच्या गतिमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. वाहनांची दिवसरात्र ये-जा ल्राहत असल्याने ज्येष्ठ नागरिक व बालकांना रस्ता ओलांडणे कठीण होते. वर्धा-आर्वी मार्गावरील या केळकरवाडी चौकात गतिरोधक बसविणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. या मागणीचे निवेदन श्रीराम सिटीचे कर्मचारी वर्ग, पालक तसेच निरज इंगोले, हर्षल म्हस्के, सतीश तेलरांधे, संदीप पेटकर, अमोल राऊत व नागरिकांच्या उपस्थितीत देण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी)
केळकरवाडी चौकात गतिरोधक बसवा
By admin | Updated: February 12, 2016 02:43 IST