कामांचा खोळंबा : अधिकारी अप-डाऊनच्या वारीवरसुरेंद्र डाफ - आर्वीउपविभागीय अधिकाऱ्यासह आर्वीच्या शासकीय कार्यालयाचा कारभार अतिरिक्त भारावर सुरू आहे. या कारणाने येथे येणाऱ्या नागरिकांची शासकीय कामाकरिता त्रेधा उडत आहे. यामुळे उपविभागात रिक्त असलेली पदे भरण्याची गरज निर्माण झाली आहे.आर्वी, आष्टी, कारंजा हे तीन तालुके मिळून आर्वी शहरात उपविभागीय कार्यालय तयार झाले; परंतु या गावातील उपविभागीय महसूल अधिकारी या महत्त्वाच्या पदासह आर्वीतील विविध शासकीय कार्यालयाचा भार अतिरिक्त प्रभारावर सुरू आहे. अधिकारी पदाचा प्रभार असलेले अनेक अधिकारी ये-जा मध्ये अडकल्याने शासकीय कामाची गती मंदावली आहे. सामान्य नागरिकांना साध्या कामासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून ‘साहेब आज नाहीत’ हे ऐकूण आल्यापावली परत जाण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बारावीचा व दहावीचा निकाल लागून आठवडा उलटत आहे. पुढच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी सध्या तहसील कार्यालयात जातीचा दाखला, उत्पन्न, क्रिमीलेअर, रहिवासी प्रमाणपत्र व इतर दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आर्वीचे उपविभागीय अधिकारी शेखर सिंग यांची बदली झाल्याने त्यांचाही अतिरिक्त कार्यभार तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याकडे आहे. सध्या त्यांच्यावर तिहेरी भार आहे. यात पावसाळ्यात उद्भवणारी पूर परिस्थितीची समस्या आहेच. शिवाय आर्वी उपविभागात मोठ्या प्रमाणात गौणखनिज संपत्ती आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल यंत्रणेला डोळ्यात तेल घालून रहावे लागत आहे. असे असताना येथे अधिकऱ्यांची पदे रिक्त आहेत. जून - जुलै या दोन महिन्यात महसूल, तहसील व शासकीय कार्यालयाच्या कामाचा, नैसर्गिक, आपत्ती व इतर महत्त्वाची कामे असतात. आर्वीत मात्र अतिरिक्त भाराचा ताण असल्याने कामे खोळंबली आहेत. याचा सामान्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एसडीओसह शासकीय कार्यालये प्रभारावर
By admin | Updated: June 23, 2014 00:14 IST