वडनेर : या पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये दारूविक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढले असून दारूविके्रत्यांमध्ये चढा-ओढ सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या वडनेर गावासह परिसरातील गावांमध्ये मुबलक दारू उपलब्ध असल्याचे निदर्शनास येते. काही दारूविक्रेते पिणाऱ्याच्या घरपोच दारू उपलब्ध करून देत असल्याने दारूविक्रेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले असून या प्रकारावरुन दारूविक्रेते पुन्हा सक्रीय झाल्याचे निदर्शनास येत आहे. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्याने दारुमुक्त जिल्हा अशी जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. जिल्ह्यात दारूबंदी असूनही सर्वाधिक दारू याच जिल्ह्यात विकली जात असल्याचे वास्तव नेहमीच पहावयास मिळते. काही गावांमध्ये पोलिसांचा भार महिला मंडळानी उचलला असून दारूवर अल्प प्रमाणात नियंत्रण आणले आहे. असे असले तरी दारू विक्रेत्यांना पोलिसांचे भय नसेल तर गावातील महिला मंडळे काय करणार, असा प्रश्न उपस्थित होतो. गावांमध्ये अनेक वर्षापासून अवैध धंदे सुरू असल्याने दारूच्या आहारी गेलेल्या कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांच्या संसाराची यामुळे वाताहत झाली आहे. दारूच्या नशेत कित्येकांनी आत्महत्या केली तर अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. दारूविक्रेते घरपोच दारू पुरवत असल्याने त्यांच्यातही स्पर्धा निर्माण झाली आहे. याकडे नव्यानेच आलेल्या वडनेरच्या ठाणेदारांनी लक्ष देऊन परिसरातील दारूविक्री थांबवावी, अशी मागणी महिला मंडळ तसेच नागरिक वारंवार करीत आहे.(वार्ताहर)
दारूच्या महापुरात कुटुंबांची वाताहत
By admin | Updated: December 6, 2014 22:54 IST