‘आॅनलाईन’ खरेदीमध्ये नागरिकांची फसवणूकवर्धा : तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये सर्वच हायटेक होत असल्याचा प्रत्यय येत आहे. आता ग्रामीण भागातही ‘आॅनलाईन’ खरेदीचे प्रस्थ माजले आहे; पण यातच फसवणूक होत असल्याचेही समोर येत आहे. जिल्ह्यात अनेकांना मोबाईलच्या नावावर लक्ष्मीची मूर्ती वा अन्य वस्तू पाठवून फसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे.नागरिकांना मोबाईलवर ‘लकी स्कीम’मध्ये तुमच्या क्रमांकाला बक्षीस लागले, असे सांगून फसवणूक केली जात आहे. मोबाईलवर आलेल्या ‘कॉल’मध्ये विशेष कंपनीच्या मोबाईलचे तुम्हाला बक्षीस लागले आहे. अल्प किमतीत महागडा मोबाईल मिळू शकतो. तीन ते साढे तीन हजार रुपयांत मोबाईल मिळणार, असे सांगून पार्सल पाठविले जाते. यानंतर पुन्हा १५ दिवसांनी त्याच क्रमाकांवरून कॉल येतो. मोबाईल मिळाला की नाही, याची विचारणा केली जाते. मोबाईल मिळाला नसेल तर मुख्य पोस्ट कार्यालयात जाऊन चौकशी करण्यास सांगितले जाते. टपाल विभागात चौकशी केली असता प्रथम पैसे भरावे लागतात. पोस्ट आॅफीसमध्ये पैसे भरल्यानंतर पार्सल उघडता येते. या पार्सलमध्ये मोबाईल असावा, अशी सामान्यांची अपेक्षा असते; पण त्यात एक छोटी लक्ष्मीची मूर्ती वा अन्य वस्तू दिसतात. यामुळे नागरिकांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत पोलिसांतही तक्रार घेतली नाही. सदर मोबाईलवर क्रमांकावर संपर्क केला तर तो बंद आढळतो. हे प्रकार वाढीस लागले असून नागरिकांनीच सावध राहणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)
‘बुक’ केला मोबाईल; पण पाठविली लक्ष्मीची मूर्ती
By admin | Updated: February 22, 2016 02:17 IST