सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : चीनमध्ये गेल्या महिन्याभरापासून कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने जागतिक स्तरावर कापूस व्यापारात मंदी आली आहे. याचाच परिणाम कापसाची मोठी बाजारपेठ असलेल्या आर्वीच्या बाजारावरही पडला असून येथील कापसाची आवक घटली आहे. आतापर्यंत केवळ साडेतीन हजार क्विंटलच आवक आहे.आर्वीची कापूस बाजारपेठ ही विदर्भात प्रसिद्ध आहे. आर्वी परिसरात ११ च्यावरती जिनिंग प्रेसिंग असून यात विकल्या जाणाऱ्या सर्व कापसाच्या गाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर विक्रीसाठी पाठविल्या जातात. भारतातील कापूस खरेदी करणारा चीन हा प्रमुख देश आहे. दरवर्षी भारतातून जाणाऱ्या कापसाची कोट्यवधीत उलाढाल आहे. परंतु गेल्या एक महिन्यापासून कोरोनामुळे तेथील दळणवळणाची साधने बंद असल्याने बाजारपेठेत सध्या कापसाची आवक मंदावली आहे. जागतिक मंदीचा फटका आर्वीच्या कापूस बाजारपेठेलाही बसला आहे. येथे विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक राहते. परंतु यावर्षी केवळ साडेतीन हजार क्विंटलच कापसाची आवक झाली आहे. सध्या बाजारपेठेत कापसाचे दर ५ हजार १०० रुपयांवरच स्थिरावले असल्याने कापूस उत्पादकांनीही बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे. भाव वाढण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
गाठीपासून रुई व कापड धागा बनविण्यासाठीची मोठी उलाढाल भारतात आहे व त्यातून रुई ही मोठ्या प्रमाणात चायनाला जाते परंतु एक महिन्यापासून कापसाची मॅनीफॅक्चरींगची सर्व उद्योगात मंदीचे सावट आहे. कोरोना व्हायरस लवकर आटोक्यात न आल्यास त्याचा मोठा फटका कापूस व रुई व्यापाऱ्यास बसणार आहे.- सचिन शर्मा, कापूस व्यापारी, आर्वी.