भिंत, छत, चौकीदार नसलेली ‘स्टोअर रूम’ : लाखोंची संपदा जागीच सडून नष्ट होण्याची भीतीरूपेश खैरी/पराग मगर वर्धाछत ना भिंती, चौकीदारही बेपत्ता अशा विचित्र अवस्थेत असलेल्या वर्धा नगर परिषदेच्या ‘स्टोअर रूम’ मध्ये पालिकेचे भंगार पडून आहे. या भंगाराचा लिलाव झाल्यास पालिकेला लाखो रुपयांचा लाभ होणे शक्य आहे. असे असताना पालिकेच्या या स्टोअर रूम कडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. येथे कोणीही या आणि पालिकेचे भंगार घेवून जा, अशी स्थिती आहे. पालिकेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे याकडे लक्ष देण्याची सवड पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसत आहे. यावर उपाय योजना आखण्यापेक्षा केवळ खेद व्यक्त करण्याची भाषा पदाधिकारी बोलत आहे. सताड उघड्या राहणाऱ्या या स्टोअर रूम मध्ये केवळ भंगार साहित्य नाही तर काही नवीन घटंगाड्याही आहे. त्या एका साखळी कुलूपाने बांधून आहेत. त्यांची तेवढीच सुरक्षा येथे आहे. या घंटागाड्यांसह इतर साहित्यही उघड्यावर उन्ह, वारा, पाऊस झेलत आहे. निसर्गाच्या या माऱ्यामुळे बरेच साहित्य सडून जागीच नष्ट होण्याच्या स्थितीत आले आहे. यामुळे कधी काळी त्या साहित्याची येणारी किंमत निम्यावर आली आहे. हे साहित्य गत सात वर्षांपासून येथे आहे. साहित्याचा लिलाव करण्याची प्रक्रिया मध्यंतरी करण्यात आली. ही प्रक्रीया करणारा मुख्याधिकारी बदलून जाताच बारगळली. यावर अद्याप कुठलीही कारवाई नाही. लिलावाची प्रक्रीया आॅनलाईन असल्याने विलंब होत असल्याचे भंगाराची व्यवस्था सांभाळणाऱ्या विभागाचे कर्मचार सांगत आहेत तर या संदर्भात येत्या विशेष सभेत चर्चा करण्यात येणार असल्याचे पालिकेचे उपाध्यक्ष सांगत आहेत. यामुळे पालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुठलाही वचक नसल्याचे दिसून येत आहे.नगर पालिकेचे भंगार रामभरोसेकुजलेल्या ट्रकचा प्रस्ताव आरटीओकडेनगर परिषद प्रशासनाच्यावतीने ट्रकची खरेदी करण्यात आली होती. कालांतराने तो ट्रक जुना झाला आणि बंद पडल्याने पालिकेद्वारे अडगळीत टाकण्यात आला. सध्या त्या ट्रकचे केवळ अवशेष शिल्लक असल्याचे दिसते. पाऊस आणि उन्हामुळे ट्रकचे संपूर्ण साहित्य कुजले असून केवळ सांगाडाच शिल्लक आहे. कित्येक वर्षांपासून सडत असलेला हा ट्रक अद्यापही भंगारामध्ये विकण्यात आलेला नाही. या प्रकरणी पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता कुजलेल्या ट्रकच्या विक्री प्रकरणी अनेकदा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे; पण त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे सदर ट्रक जागेवरच कुजला असून सध्या तो कुठल्याही उपयोगाचा नसल्याचेच दिसते. ट्रक बंद झाला असला तरी त्याची वेळीच विल्हेवाट लावली असती तर पालिकेला निधी उभा करता आला असता; पण ही कारवाई वेळेत न झाल्याने सध्या ट्रकचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. सध्या तो कुजलेला असल्याने भंगारातही विशेष किंमत येणार नाही, अशी स्थिती आहे. पालिका प्रशासनासह आरटीओ कार्यालयही ट्रकची विल्हेवाट लावण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ट्रकचा सांगाडा भंगारात पडून आहे. कचरा ढोले जागीच जिरण्याची भीतीसंत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत नगर परिषद प्रशासनाच्यावतीने कचरा ढोल्यांची खरेदी केली होती. अनेक वर्षे हे कचऱ्याचे ढोले शहरातील विविध चौक, वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते; पण या ढोल्यांमध्येच नागरिकांद्वारे कचरा जाळण्याचे प्रकार केले जात होते. शिवाय ढोल्यामध्ये ओला आणि सुका दोन्ही प्रकारचा कचरा टाकला जात होता. यामुळे बहुतांश कचऱ्याचे ढोले सडले. यामुळे गत काही वर्षांपासून कचऱ्याचे ढोले पालिकेच्या रिक्त जागेवर ठेवण्यात आले आहेत; पण त्यांची विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. यामुळे सर्व कचरा ढोले जागेवरच जिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही कचऱ्याचे ढोले, ट्रक, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. ते सडण्याची प्रतीक्षा तर पालिका प्रशासनाद्वारे केली जात नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. शहरातील सडलेले ढोले पालिकेने काढून घेतले. त्या जागेवर नवीन ढोले ठेवणे गरजेचे होते. यासाठी जुने ढोले भंगारात विकून नवीन ढोल्यांची खरेदी करणे शक्य झाले असते; पण त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. अद्यापही कचऱ्याचे ढोले जैसे थे पडून आहेत. पावसामुळे ते आणखी खराब होत असल्याने पुन्हा त्याचा उपयोग होणे अशक्यच ठरणार आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणेही गरजेचे झाले आहे. नव्या घंटागाड्याही उघड्यावरकचरा गोळा करण्यासाठी शहरभर ठेवण्यात आलेले ढोले निकामी झाल्याने पालिकेच्यावतीने नवीन घंटागाड्यांची खरेदी करण्यात आली. या घंटा गाड्यांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक वॉर्डातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जात होती वा शहराच्या ‘डम्पिंग यार्ड’मध्ये तो टाकला जात होता; पण गत काही महिन्यांपासून कचरा गोळा करणाऱ्या या घंटागाड्याही उघड्यावरच धूळ खात पडून आहेत. सुस्थितीत असलेल्या या घंटागाड्या कचऱ्यात का टाकल्यात, हे मात्र कोडेच आहे. सिग्नल दिव्यांसह ट्यूबलाईट कचऱ्यातशहरातील रस्त्यांवर लावले जाणारे सिग्नलही कित्येक दिवस पालिकेच्या कचऱ्यामध्येच पडून होते. आता शहरात विविध ठिकाणी लावण्याकरिता आणलेले आणि वापरून बंद झालेले ट्यूबलाईटही कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडून असल्याचे दिसून आले. ट्यूबलाईट बंद अवस्थेत असले तरी ते असे अस्ताव्यस्त ठेवता येत नाही. त्यांची वेळीच विल्हेवाट लावणे गरजेचे असते; पण पालिका प्रशासनाकडे यासाठी वेळ नसल्याचेच दिसून येत आहे. यासह अनेक किमती साहित्यही पालिकेच्या त्या जागेवर सडत आहे. लाखो रुपयांचा खर्च करून विकत घेतलेले साहित्य सडत असल्याने आश्चर्यच व्यक्त होत आहे.
कोणीही या, पालिकेचे भंगार घेऊन जा
By admin | Updated: June 28, 2015 02:33 IST