अमरदीप नंदेश्वर : १५०० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ पुलगाव : डेंग्यू हा एडिस डांसामुळे पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात रूग्णाचे प्लेटलेट कमी झाल्यामुळे रक्तस्त्राव व मज्जाघातामुळे मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. या मरणप्राय आजाराविरोधात शासकीय स्तरावर राबविल्या जाणारी डेंग्यूविरोधी मोहीम ही आरोग्य विभागापुरती मर्यादित न राहता ती विद्यार्थी व शाळांतूनही प्रसारीत व्हावी. लोकाभिमुख होवून जनमाणसाची चळवळ झाली पाहिजे, असे मत नाचणगाव प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरदीप नंदेश्वर यांनी व्यक्त केले. शालेय डेंग्यू जनजागृती मोहिमेच्या सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी १५०० विद्यार्थ्यांना डेंग्यु मुक्तीची शपथ दिली. तीव्र ताप, डोकेदुखी अंगावर पूरळ येणे, तीव्र पोटदुखी व रूग्णास होणारा रक्तस्त्राव अशाप्रकारची लक्षणे असलेल्या डेंग्यू या आजारावर कोणताही ठोस उपचार नाही. या आजारावर उपचार करण्यापेक्षा सामाजिक स्तरातून सतर्कता बाळगत प्रतिबंध केला पाहिजे. गावागावातून परिसर स्वच्छता, नाल्यांची साफसफाई व नाल्या वाहत्या करणे, साठवलेली पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा धुवून पुसून कोरडी करणे, कोरडा दिवस पाळणे गप्पी मासे साचलेल्या पाण्यात सोडणे, अशा प्रकारच्या उपायोजना ग्रामीण व शहरी स्तरातून घराघरातून राबविल्या गेल्या तरच आपण आपले गावच नव्हेतर संपूर्ण जिल्हा सुद्धा डेंग्यूमुक्त करू शकू, असे आवाहन नंदेश्वर यांनी केले. जिल्ह्यात १ ते १५ आॅगस्टपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे यांच्या मार्गदर्शनात शालेय डेंग्यू जागृती मोहीम राबविल्या जात आहे. यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर वाके, प्रा.आ. केंद्राचे वैज्ञानिक अधिकारी चंद्रकांत शहाकार यांनी मार्गदर्शन केले. प्रा.आ. केंद्राचे आरोग्य सहाय्यक शरद डांगरे, प्रशांत आदमने, आरोग्य सेवक गजानन वानरे, दिनेश भारती, अजय पवार यांच्या सहकार्याने २० गावात किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण, गप्पी मासे सोडणे, विशेष रक्त तपासणी, विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे.(तालुका प्रतिनिधी)
डेंग्यूविरोधी जनजागृतीची चळवळ लोकाभिमुख झाली पाहिजे
By admin | Updated: August 12, 2016 01:48 IST