राजेश भोजेकर वर्धाकचऱ्यात आपले अन्न शोधणाऱ्या एका कबुतराच्या गळ्यात प्लास्टिक अडकले. कबुतराने आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न केला असता त्या प्लास्टिकमध्ये हवा शिरल्याने तो जमिनीपासून सुमारे ३-४ फूट अंतरापर्यतच उडू शकत होता. ही बाब एका तरुणाच्या लक्षात येताच त्याने कबुतराला पकडून त्याची प्लास्टिकपासून सुटका करण्यासाठी धडपड केली; पण अचानक भरधाव चार चाकी वाहन आले. गळ्यात प्लास्टिक असल्यामुळे सैरभर झालेले ते कबुतर त्या वाहनाच्या काचावर धडकले आणि खाली पडले तर त्याच्या अंगावरून वाहनाचे चाक गेले. यात तो तडफडून जागीच गतप्राण झाला. या ठिकाणी एखादी व्यक्ती असती तर एकच गर्दी झाली असती आणि सर्वांनी त्या वाहन चालकाला पकडून चोपले असते. आणखी काय काय केले असते, हे सर्वांनाच ठाऊक आहे; मात्र त्या मुक्या जिवाची काय पर्वा. काहींनी अरेरे.. म्हणत पूढे जाणेच पसंत केले. त्या तरूणाने त्या कबुतराला उचलून बघितले असता त्याच्या गळ्यात प्लास्टिक अडकलेले होते. शनिवारी सकाळी ११.४० वाजता ठाकरे मार्केटपुढे घडलेल्या या घटनेला वाहनचालक जबाबदार की प्लास्टिक रस्त्यावर फेकणारा, हा गंभीर सवाल सर्वांना सतावणारा ठरला.कायद्याने प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. प्लास्टिक वापरू नये म्हणून पालिकाही आवाहन करते. इतकेच नव्हे तर, जो दुकानदार ग्राहकांना प्लास्टिक देतो वा विकतो त्यांच्यावर कारवाईही केली जाते; पण ठोठावलेला दंड भरून पुन्हा गुन्हा करण्यास दुकानदार मोकळे होतात. प्लास्टिक बंदी कशासाठी, याचा जराही विचार करताना कुणी दिसत नाही. पूर्वीच्या नागरिकांप्रमाणे आता सर्वांनाच हातात कापडी पिशव्या घेऊन जाण्याची लाज वाटते. आपल्या लाजेखातर दुसऱ्याचा जीवही जाऊ शकतो, याचे शल्य मात्र कुणाच्याही मनाला बोचताना दिसत नाही. ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या नावावर उच्च प्रतीचे प्लास्टिक दुकानात ठेवले जाते.या प्लास्टिकचा वापर झाल्यानंतर ते नष्ट केले पाहिजे, ही काळजी कुणीही घेताना दिसत नाही. याबाबतची जनजागृतीही झालेली नाही, ही वास्तविकता आहे. भाजीपाल्यापासून तर कापडाच्या दुकानापर्यंत व इतरही सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये बंदी असताना नियमबाह्य असलेल्या प्लास्टिकचा बिनबोभाटपणे वापर केला जात आहे. हा प्रश्न कारवाईने सुटणारा असता तर आतापर्यंत प्लास्टिक बाजारातून हद्दपार झाले असते. ते मनातून करावे लागते. मग, हेच प्लास्टिक रस्त्यावर फेकल्यानंतर जनावरे खातात. त्यांच्या पोटातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक निघल्याच्या घटना ऐकून आश्चर्य करताना सारेच दिसतात; पण प्लास्टिकचा त्याग करण्याची मनीषा कुणीच बाळगताना दिसत नाही. परिणामी, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यालाही आपला नाहक जीव गमवावा लागतो. याचा विचार करण्याची सवड कुणाजवळ आहे!
अन् प्लास्टिकने काही क्षणात घेतला कबुतराचा बळी!
By admin | Updated: December 27, 2015 02:27 IST