जिल्ह्यात अतवृष्टीनंतर रबी पिकांना गारपीटमुळे प्रचंड झळ बसली. अनेकांचे उभे पीक भुईसपाट झाले. या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करून शेतकर्यांना मदत देण्याचे जाहीर केले. या घटनेला अडीच महिने पूर्ण झाले; मात्र शेतकर्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. याचे खरे कारण माहिती अधिकारातून समोर आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८ टक्के मदतीचे वाटप झाले असताना जिल्हा कृषी अधीक्षकांनी ९१ टक्के वाटप पूर्ण केल्याची माहिती जिल्हाधिकार्यांना पुरविली आहे. माहिती अधिकारातून कृषी अधीक्षकांचे पितळ उघडे पडले असून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. फेब्रुवारी व मार्च २0१४ या कालावधीत जिल्ह्यात पाऊस व गारपीट झाली. यात अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले. शासनाच्या नियमानुसार त्यांना मदत वाटप केल्याचा अहवाल २१ मे २0१४ रोजी जिल्हा कृषी अधीक्षकांनी जिल्हाधिकारी वर्धा, विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना पाठविला. यामध्ये वर्धा तालुक्यात ५0 टक्के नुकसान आहे. शेतपीक नुकसानीचे क्षेत्र १४८५ हेक्टरआर आहे. याकरिता २ कोटी १ लाख रुपयांचा निधी मिळाला असून त्यापैकी १ कोटी ६९ लाख ८४ हजार रुपये शेतकर्यांना वाटप करण्यात आले आहे. वाटप करण्यात आलेल्या निधीची टक्केवारी ८५ असून शेतकरी संख्या २१३२ आहे. सेलू तालुक्यात ९८४ हेक्टरआर नुकसानीपोटी एकूण १ कोटी ४0 लाख रुपयांपैकी शेतकर्यांना १00 टक्के वाटप झाल्याचे दाखविण्यात आले. शेतकरी संख्या १९२३ आहेत. देवळी तालुक्यात ३८५.३0 हेक्टरआर नुकसानीपोटी एकूण ६0 लाख रुपयांपैकी ५५ लाख ५७ हजार वाटप केला असून त्याची ९२ टक्केवारी आहे. १३३५ शेतकरी संख्या आहे. आर्वी तालुक्यात सर्वाधिक ४११९ हेक्टरआर नुकसान झाले. या नुकसानीपोटी ६ कोटी १0 लाख रुपये निधी मिळाला. यापैकी ५ कोटी ८२ लाख रुपये वाटप झाले असून त्याची टक्केवारी ९५ आहे. शेतकरी संख्या ५,६३९ आहे. आष्टी(श.) तालुक्यात २७१२.३0 हे. आर. नुकसान झाले आहे. याकरिता एकूण ४ कोटी ३0 लाख रुपये आले असून त्यापैकी शेतकर्यांना ३ कोटी ४९ लाख २0 हजार रुपये वाटप करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. वाटपाची टक्केवारी ८१ असून एकूण शेतकरी संख्या ४३८४ आहे. तालुक्यातील बँकांनी सीडी व हार्ड कॉपीमध्ये आणि इंग्रजीत नावांची यादी मागितली. या याद्या सादर करायला विलंब झाला. त्यामुळे आतापर्यंत अवघ्या २५ टक्के लोकांना वाटप झाले. जिल्हा कृषी अधीक्षक ९१ टक्के वाटप पूर्ण झाल्याचे दाखवून दिशाभूल करीत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. कारंजा (घा.) तालुक्यात १७६२ हेक्टरआर नुकसान झाले असून २ कोटी ७0 लाख रुपये मिळाले आहे. त्यापैकी २ कोटी ५४ लाख ६९ हजार शेतकर्यांना वाटप करण्यात आला. वाटपाची टक्केवारी ९४ असून एकूण शेतकरीसंख्या ५७४३ दाखविली आहे. हिंगणघाट तालुक्यात ५९४.६५ हे.आर. नुकसान दाखविण्यात आले आहे. एकूण ८0 लाख निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी ६६ लाख ५६ हजार रुपये वाटप करण्यात आले. वाटपाची टक्केवारी ८३ आहे. एकूण शेतकरी संख्या १२८१ आहे. समुद्रपूर तालुक्यात शुन्य टक्के नुकसान झाल्याची आकडेवारी दाखविण्यात आली आहे.
२८ टक्के वाटप दाखविला ९१ टक्के
By admin | Updated: June 2, 2014 01:35 IST