हिंगणघाट : शेतातील गोठ्याला अज्ञात इसमाने लावलेल्या आगीत १ लाख २० हजारांचे शेतीपयोगी साहित्य खाक झाले. ही घटना सिरसगाव (बाजार) येथील शेतकरी अमित बाबाराव राडे यांच्या शेतात घडली. याबाबत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी, मागणी हिंगणघाटच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.अमित राडे यांच्या सिरसगाव (बाजार) येथील शेतात गोठा आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास या गोठ्याला अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीत कुटार व कडब्याचे ढिगारे, गव्हांडा जळून खाक झाले. कडबा कुटारासह ताडपत्री, वखर, शेणखताचा ढीग तसेच विविध साहित्याचा कोळसा झाला. जळालेल्या साहित्याची किंमत एक लाख २० हजार असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती पोलीस व तलाठ्याला दिल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. राडे यांच्या शेतातील सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडल्याने जनावरांच्या वैरणाची समस्या निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात नापिकी तसेच या लागलेल्या आगीने अमित राडे अधिकच आर्थिक संकटात सापडले आहे. शासनाने आर्थिक मदत करून आग लावणाऱ्या इसमाचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
गोठ्याला आग १.२० लाखांचे नुकसान
By admin | Updated: April 22, 2016 03:55 IST