ठाणे : टंचाईमुळे ठाणेकरांना सध्या दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागत असतानाच शनिवारी घोडबंदर हाय वेवर असलेली ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी सकाळी फुटली. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले. मात्र, मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट रस्त्यावर आल्याने बराच वेळ वाहतूककोंडीही झाली होती. जलवाहिनी फुटल्याने घोडबंदर पट्ट्यातील जवळपास दोन लाख रहिवाशांचा पाणीपुरवठा यामुळे खंडित झाल्याने आधीच आठवड्यातून चार दिवस टंचाईची झळ सोसणाऱ्या रहिवाशांना शनिवारीही निर्जळीचा सामना करावा लागला. स्टेम प्राधिकरणाची ही जलवाहिनी ३५ वर्षे जुनी असून तिच्या माध्यमातून घोडबंदर पट्ट्यातील रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो. सकाळी १० च्या सुमारास ती फुटली. त्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. पाण्याच्या अतिदाबामुळे जलवाहिनी फुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून हा प्रकार घडल्यानंतर अर्ध्या तासात जलवाहिनीच्या दुरु स्तीच्या कामाला सुरु वात झाली. ही जलवाहिनी जमिनीच्या सहा ते सात फूट खाली असल्याने दुरु स्तीच्या कामातही अडचणी येत होत्या. पुरवठा बंद करून पाण्याचा निचरा झाल्यावरच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जलवाहिनीमधील पाणी घोडबंदर रोड तसेच आनंदनगर परिसरात पसरल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.पातलीपाडा आणि ओवळा परिसरातील रहिवाशांना जलवाहिनी फुटल्याचा सर्वाधिक फटका बसला. जलवाहिनी फुटली तेव्हा पाण्याचा दाब एवढा होता की, त्यामुळे रस्त्याचेही काही प्रमाणात नुकसान झाले. जलवाहिनी फुटल्यानंतर या परिसरातील पाणीपुरवठा बंद करेपर्यंत रस्त्यावर दीड फुटापर्यंत पाणी साचल्याची माहिती ग्रीन एकर गृहसंकुलातील रहिवासी आणि या घटनेचे प्रत्यक्षदर्शी विशाल गजरे यांनी दिली. (प्रतिनिधी)
ठाणेकरांसाठी पाणीबाणी
By admin | Updated: June 5, 2016 03:11 IST