उल्हासनगर : शहरात होत असलेल्या धुवांधार व रिमझिम पावसाने अनेक भागात पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडून विधुत खांब वाकून विधुत वाहिन्या तुटल्या आहेत.
उल्हासनगर महापालिकेने केलेला नाले सफाई दावा फोल ठरला असून गोलमैदान, राजीव गांधीनगर, राधास्वामी चौक, आयटीआय रस्ता, कॅम्प नं-३, स्टेट बँक समोरील मुख्य रस्ता आदी ठिकाणी रिमझिम व संततधार पावसाचे पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. तर शहर पश्चिम येथे एक झाड विधुत खांबावर पडल्याने, खांब वाकून विधुत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे परिसराचा विधुत पुरवठा काही तास बंद होता. शहरात संततधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचल्याने, नागरिकांना पाण्यातून जावे लागत असल्याचे चित्र आहे. तर अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्याने, रस्त्यावरून नालीतील पाणी वाहत आहेत. कोटयवधी रुपये खर्चूनही नाले सफाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.