ठाणे : आधीच ठाणेकरांना चांगल्या प्रवासाची हमी न देऊ शकलेल्या ठाणे परिवहन सेवेची अवस्था आता आणखी वेगळ्या कारणामुळे चर्चेत येण्याची शक्यता आहे. परिवहनचे बसथांबे हे महिला प्रवाशांसाठी असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे याची कबुली दस्तुरखुद्द ठाणे परिवहन सेवेने दिली असून शहरातील काही बसथांब्यांवर मद्यपी आणि गर्दुल्ल्यांनी बस्तान मांडल्याने महिला प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा बसथांब्यांवर पेट्रोलिंग करण्यासाठी परिवहन प्रशासनाने थेट ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र दिले असून महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घ्यावी, अशी विनंती केली आहे. सध्या महापालिका आयुक्तांनी ठाणे परिवहन सेवा सुधरवण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. परंतु, परिवहनची सेवा अद्यापही सुधारताना दिसत नाही. त्यात, परिवहनच्या अनेक बसथांब्यांची अवस्थाही तशी फारशी चांगली नाही. शहराच्या विविध भागांत परिवहनचे ४७० बसथांबे आहेत. यापैकी बहुतांश थांब्यांवर सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, संध्याकाळी उशिरा ती कमी होत असून मोजकेच प्रवासी बसची वाट बघत उभे असतात. यामध्ये काही महिला प्रवाशांचादेखील समावेश आहे. काही थांबे हे आडमार्गावर असल्याने अशा थांब्यांवर मद्यपी आणि गर्दुल्ल्यांनी अड्डे तयार केले आहेत. घोडबंदर भागातील डोंगरीपाडा थांब्याबरोबरच अन्य काही थांब्यांवरसुद्धा असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी परिवहनकडे आल्या होत्या. काही परिवहन सदस्यांनीदेखील यासंदर्भात परिवहन व्यवस्थापकांचे लक्ष वेधले आहे.
परिवहनचे बसथांबे महिला प्रवाशांसाठी असुरक्षित
By admin | Updated: May 11, 2016 02:04 IST