मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिकेने सुरू केलेल्या रस्ता रुंदीकरणात कोणताही मोबदला न देताच मनमानीपणे सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शहरातील विविध व्यापारी संघटनांनी मीरा भार्इंदर बचाव समिती स्थापन केली आहे. समितीच्यावतीने महापालिकेवर सोमवारी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे यांनी पाठींबा दिल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे. मोर्चा टाळण्यासाठी आयुक्त व भाजपाची धडपड सुरु झाली आहे. त्यासाठी आयुक्तांनी शुक्रवारी बैठक घेऊन टीडीआर तुमच्या सहमती शिवाय देणार नाही असा प्रस्ताव पुढे ठेवला तरीही मोर्चा काढण्याचा निर्णय अद्याप कायम ठेवला आहे.मीरा भार्इंदर महापालिकेने शहरात रस्ता रुंदीकरण करताना हुकुमशाही पध्दतीने तोडली जात असल्याचा आरोप यापूर्वीच विविध राजकीय नेत्यांनी केला आहे. नागरिकांचे पुनर्वसन व त्यांना मोबदला न देताच पालिकेने बेघर करु नये अशी या सर्वांची मागणी होती. ज्या ठिकाणी वर्दळ नाही अशा भागातील औद्योगिक गाळेही पालिकेने दमदाटी करुन तोडायला लावल्याने व्यापाऱ्यांमध्ये भाजपाविरोधात संताप व्यक्त होत आहे. अर्धवट तुटलेले बांधकाम दुरुस्त करण्यासाठी दोन ते पाच लाखांचा भूर्दंड प्रत्येकाला सहन करावा लागला आहे. शिवाय उद्योग बंद ठेवावे लागल्याने नुकसान झाले. उद्योग हटवून मोक्याच्या जमिनी बांधकामांसाठी खुल्या करणे तसेच टिडीआर मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरु असल्याचा आरोप होऊ लागला आहे. या असंतोषातूनच व्यापारी व उद्योजकांच्या संघटनांनी मीरा भार्इंदर बचाव समिती स्थापन करुन ‘मीरा भार्इंदर वाचवा’ अशी हाक देत सोमवारी गोडदेव नाक्याहून सकाळी साडे दहा वाजता पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. ज्यांची बांधकामे तोडली त्यांना मोबदला मिळावा, मनमानीपणे चाललेले तोडकाम थांबवावे आदी प्रमुख मागण्या आहेत. मीरा भार्इंदर स्मॉलस्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, महाराष्ट्र स्टील बफिंग असोसिएशन सह किराणा, कटलरी, मार्बल, माथाडी या संघटना सहभागी होणार आहेत. मीरा भार्इंदर रहिवासी संघ ही समिती देखील यात सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे यातील विविध व्यापारी संघटना वा त्यांचे पदाधिकारी हे भाजपाशी संबंधित आहेत. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांचा आज धडक मोर्चा
By admin | Updated: June 20, 2016 02:09 IST