ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेबरोबर भाजपाचे सर्वच पदाधिकारी एकत्र असले, तरी मुरबाडचे भाजपाचे आमदार किसन कथोरे यांचे मन वळविण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. त्यांच्या समर्थकांची ५२ मते आहेत. यामुळे त्यांचे मन वळविण्यासाठी वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांनाही पाचारण करण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेतला जाणार आहे.एकही मत फुटू नये म्हणून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना आणि कथोरे यांच्यात मागील काही काळात खटके उडाले असल्याने त्यांची मनधरणी करणार तरी कोण, असा सवाल शिवसेनेला सतावत आहे. या संदर्भात कथोरे यांना छेडले असता, मी महायुतीत आहे, त्यामुळे शिवसेनेने जर आम्हाला मदत केली तर आम्हीदेखील करू अशी भूमिका त्यांनी मांडली. परंतु, पूर्वी उडालेल्या खटक्यांबाबतही त्यांनी वाच्यता केल्याने, त्यांचे मन वळविणे शिवसेनेसाठी थोडे अवघड ठरणार आहे. अद्याप आपल्याशी कोणीही या संदर्भात चर्चा केली नसल्याचेही कथोरे यांनी सांगितले. त्यांच्याकडे मुरबाडमध्ये १९, बदलापूरमध्ये २२ आणि अंबरनाथमध्ये ११ अशी एकूण ५२ निर्णायक मते आहेत.
कथोरेंचे मन वळविण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरूच
By admin | Updated: May 26, 2016 02:23 IST