लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : बिले थकीत असल्यामुळे कंत्राटदारांमध्ये नाराजीचे वातावरण असताना केडीएमसीचे मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी मार्च २०१७ अखेरची ५४ कोटींची बिले देणे प्रलंबित असल्याचे स्पष्टीकरण देत जलअभियंता आणि शहरअभियंता यांनी पाठवलेली नवीन बिले स्वीकारण्यास नकार दिला आहे. अत्यावश्यक कामांची बिले फक्त पाठवावीत, अशा सूचना केल्या आहेत.एकीकडे उत्पन्न आणि खर्च यामधील वाढती तफावत, तर अपुरे मिळणारे अनुदान यात केडीएमटीची लाखो रुपयांची देणी प्रलंबित आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना वेतनही विलंबाने मिळत आहे. दरम्यान, मागील वर्षी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट होता. परिणामी, कंत्राटदारांची बिले वेळेवर मिळू शकलेली नाहीत. त्यामुळे विकासकामांसाठी कंत्राटदार येण्यास उत्सुक नसल्याचे चित्र होते. यंदाही ते कायम आहे. मार्च २०१७ अखेर सुमारे ५४ कोटींची बिले प्रलंबित असल्याचे पत्र चव्हाण यांनी प्रभारी जलअभियंता चंद्रकांत कोलते आणि शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांना पाठवले आहे. निधी नसल्याने नव्याने पाठवलेली बिले परत पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. २०१७-१८ मधील बिले उपलब्ध निधीच्या आधारे सादर करण्यास कळवले जाईल. आर्थिक शिस्त राखण्यासाठी आवश्यक कामांचीच बिले सादरकरा, अशा सूचनाही चव्हाण यांनी संबंधित अभियत्यांना केल्या आहेत. निधीअभावी नवीन बिले देण्यास नकार दिल्याने कंत्राटदारांमधील नाराजीचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, चव्हाण यांच्या या कृतीवर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
केडीएमसीच्या तिजोरीत खडखडाट
By admin | Updated: May 13, 2017 00:45 IST