मीरा रोड : ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मीरा भार्इंदरमधील काही विकसकांनी बनावट यूएलसी दाखल्याचा वापर करुन सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली असतानाच मंगळवारी बिल्डरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यूएलसी प्रकरणात पोलिसांकडून छळ होत असल्याने मदतीचे साकडे घातले. विशेष म्हणजे बिल्डरांच्या शिष्टमंडळात अनेक वादग्रस्त तसेच अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांचाही समावेश होता. मीरा भार्इंदरमध्ये बनावट यूएलसी दाखल्याचा आधार घेऊन सरकारला देय असलेल्या पाच टक्के सदनिका काही विकसकांनीच विकून खाल्या आहेत. या प्रकरणी ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करुन एका बनावट यूएलसी दाखल्याप्रकरणी मनोज पुरोहित, श्यामसुंदर अग्रवाल, शैलेश शाह, रतीलाल जैन या चौघा बिल्डरांसह ठाणे जिल्हा यूएलसी कार्यालयातील हंगामी लिपीक बबन पारकर अशा पाच जणांना अटक केली आहे. यात आणखी एक आरोपी असून त्याचा शोध घेत आहेत. आतापर्यंत सरकारची सुमारे दीडशे कोटींची फसवणूक झाल्याचे या यूएलसी घोटाळ्यातून समोर आले आहे. शहरातील अनेक विकसकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे मीरा भार्इंदरमधील अनेक संबंधित बिल्डरांचे धाबे दणाणले आहे. उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये कार्यशाळेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. आमदार नरेंद्र मेहता यांनी पुढाकार घेऊन शहरातील बिल्डरांची त्यांच्याशी भेट घालून दिली. या भेटीत बिल्डरांनी यूएलसी प्रकरणी सुरु असलेल्या कारवाईबाबत भीती व्यक्त केली. पोलिसांकडून बिल्डरांचा छळ होत आहे. आम्ही व्यापारी असून त्या पध्दतीने वागणूक दिली जात नाही. यात स्वत: मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी विनंती या शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळात महापौर गीता जैन, मनसेचे उपाध्यक्ष अरुण कदम, राष्ट्रवादीचे नगरसेवक आसिफ शेख, एमसीएचआयचे मीरा भार्इंदर अध्यक्ष आशित शाह, उपाध्यक्ष दिलीप पोरवाल, जयेश शाह, रामचंद्र वैष्णव, सुरेश काबरा, गौरव पोरवाल यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
‘यूएलसी’ प्रकरणी पोलिसांकडून छळ
By admin | Updated: January 25, 2017 04:55 IST