वसई : सकवार गावात असलेला ओढा पावसाळ्यात पुराने हैराण करतो, तर उन्हाळ्यात चक्क कोरडा पडून पाणी हिरावून घेतो. त्यावर नामी उपाय आदर्श ग्राम दत्तक योजनेतून साकारण्यात आला. दोन ठिकाणी शेततळी आणि ओढा खोदाई केली असता चक्क उन्हाळ्यात पाणी लागले. त्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या सकवार परिसरातील आदिवासी पाड्यांचा पाणीप्रश्न सुटला आहे. सोबतच भात शेतीसह भाज्यांचा मळाही फुलणार आहे. ही किमया साधली आहे, विवेक राष्ट्र सेवा समितीने आमदार अतुल भातखळकर यांच्या साथीने. पावसाळ्यातील तीन महिने पूरसदृश्य परिस्थिती आणि पाऊस गेल्यानंतर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट अशी परिस्थिती सकवार गावातील १४ पाड्यांमधील ग्रामस्थांच्या अनेक पिढ्या अनुभवताहेत. मुंबई-अहमदाबाद हायवेवरील सकवार हे टकमक कडा या डोंगर उतारावर वसलेले संपूर्ण आदिवासी वस्तीचे गाव. पावसाळ्यात प्रचंड ओघाने डोंगरावरील पाणी गावाकडे येते. त्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्मण होते. येथील ओढा दुथडी भरून वाहु लागतो. पाऊस संपला की जमिनीशी समतळ असलेल्या या ओढ्यातील पाणी सखल भागात वाहून जाते. त्यानंतर या गावात दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होते. ओढा कोरडा पडतो. मग सुरु होते,पाण्यासाठी वणवण. पावसाळ्यात भात शेतीची लागवड होते. तितकेच समाधान या गावाला मिळते. त्यानंतर मात्र,९ महिने शेती ठप्प आणि शेतकरी बेरोजगार होतात.(प्रतिनिधी)पाठपुरावा व गाव दत्तक घेतलेही व्यथा भालीवली येथे सामजिक कार्य करणाऱ्या विवेक राष्ट्र सेवा समितीच्या निदर्शनास आली.पावसाळ्यातील पाणी अडवल्यास सकवारला बाराही महिने पाणी उपलब्ध होईल. लोक सहभागातून पाणी अडविण्याचे समितीने ठरवले. आमदार भातखळकर यांना प्रदीप गुप्ता यांनी ही योजना सांगितली. त्यांनी आदर्श दत्तक ग्राम योजनेत सकवार गावाला दत्तक घेतले. बोंगेपाडा आणि सुतारपाडा या गावात खोदलेल्या शेततळ्यातील झरे पाझरू लागले. त्यामुळे बोंगेपाड्याचा पाणी प्रश्न उन्हाळ्यातच मार्गी लागला आहे. वनखात्याचे पालघर ए. सी. एम. कुप्ते, डी.एम.ओ.लडकत यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले.ओढ्यात खोदले चर पाणी साठू लागले झरझरहे यश हाती लागताच समितीने टकमक कड्याचा ओढ्याकडे लक्ष केंद्रीत केले. या ओढ्यातील पाणी कसे अडवता येईल यासाठी प्रदीप गुप्ता आणि शशांक नाखरे यांनी पुण्यातील जलवर्धिनी संस्था आणि ठाण्यातील जलतज्ज्ञ अप्पा परांजपे यांच्याकडून टिप्स घेतल्या. या टिप्सच्या आधारे एक किलोमीटर लांबीच्या टकमक ओढ्याची खोली वाढवण्यात आली. महिनाभर हे काम सुरु होते.या ओढ्यात काही ठिकाणी आवश्यकतेनुसार १०, १२ आणि १५ फुटांचे चर खोदण्यात आले आहेत. त्यामुळे कोरडा पडलेल्या ओढ्यातील झरे मोकळे होऊन या खड्ड्यांमध्ये ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी जमले आहे. पोकलेनच्या सहाय्याने काम करण्यात आले. त्यासाठी नालासोपाऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते कल्पेश नाईक यांनी विनामूल्य पोकलेन उपलब्ध करून दिला. तसेच अनेक दानशूरांनी सढळ हाताने मदत केली.ओढ्याची खोली वाढवल्यामुळे मे महिन्यात झऱ्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आनंदित झाले आहेत. पावसाळ्याचे पाणी आता वाहून न जाता ते खोल ओढ्यात साचून राहणार आहे. त्याममुळे जमिनीचेही पुनर्भरण होणार आहे. बाराही महिने पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे भात शेती नंतर गवार, भेंडी, कारले, काकडी, दुधी, पांढरे, लाल कांदे अशी लवकर नफा देणारी पिके ग्रामस्थांना घेण्याचे प्रशिक्षणही विवेक राष्ट्र सेवा समितीचे शेतीतज्ञ देणार आहेत. त्यामुळे बोंगेपाडा, गावठाण, पाटीलपाडा , कारेला पाडा, गोवारीपाडा, बेणापाडा, वरखंडपाडा, सुतारपाडा यासह १४ आदिवासी पाडे लवकरच शेतीने समृद्ध झालेली दिसणार आहेत.
सकवार परिसरातील १४ पाड्यांना बारमाही पाणी
By admin | Updated: June 21, 2016 00:55 IST