रिक्षा किंवा रिक्षाचालकांकडून होणारी लूट हा प्रश्न कुणा एका शहरापुरता राहिलेला नाही. तो सगळ््या ठिकाणी आहे. आपली लूट होते हे माहित असूनही प्रवासी किंवा सर्वसामान्य नागरिक काहीच करू शकत नाही. फार तर तो पोलिसांकडे तक्रार करेल. मात्र या तक्रारीचा परिणाम होणार नाही, हे त्यालाही माहित असते. अगदीच प्रवाशांनी आंदोलन केले, तर तेवढ्यापुरती कारवाई होते. त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या...मूळात वाहतूक पोलीस, आरटीओ हे कठोर पावले उचलत नाहीत. दुसरे म्हणजे राजकीय हस्तक्षेपामुळे कुठल्याही शहरातील परिवहन सेवा सक्षम नाही. ती जर सक्षम असती, तर प्रवाशांना रिक्षाचालकांची मुजोरी सहन करावी लागली नसती. पण दुर्देवाने आपल्याकडे रिक्षा संघटनाही राजकीय पक्षांच्याच आहेत. त्यांचीच परिवहनमध्ये संघटना असल्याने सगळे सांभाळून घेतले जाते. परिवहन सेवा सुरू केल्यास आमच्या पोटावर पाय येईल, असे साकडे रिक्षाचालक या संघटनांना घालतात. प्रवाशांनी बससेवेची मागणी केल्यास रिक्षाचालक बसचालकाला, वाहकाला मारहाण करतात आम्ही कशा बस चालवणार असा प्रश्न संघटनांकडून उपस्थित केला जातो. त्यामुळे लूट सहन करतच प्रवास करावा लागतो. नियम धाब्यावर बसवणे हा तर रिक्षाचालकांचा हक्कच झाला आहे. जोपर्यंत चिरीमिरी देणे थांबत नाही तोपर्यंत रिक्षाचे मीटर डाऊनच राहणार आणि प्रवासांचा खिसा कापला जाणार हे निश्चित.काही मुजोर रिक्षाचालकांमुळे सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहराची दिवसेंदिवस बदनामी होत आहे. शहरात बहुतांश ठिकाणी मीटरवर रिक्षा धावत नसल्याने शेअर रिक्षाचा बोलबाला आहे. त्यातही शेअर रिक्षाचालकांनी नियम धाब्यावर बसवायचे अशी भीष्मप्रतिज्ञा केली आहे. तीन प्रवासी घेण्याची पारवानगी असताना बिनधास्त चौथा प्रवासी घेतला जातो. चालकाच्या बाजूला त्याला बसवले जाते. उद्या जर अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? ज्यावेळेस पोलीस तापसणीसाठी उभे असतात तेव्हा तीनच प्रवासी घेतले जातात. प्रसंगी चालक एकमेकांना पोलीस उभे असल्याची माहितीही देतात. १५ वर्ष झालेल्या भंगार रिक्षाही ठाण्याच्या रस्त्यावर धावत आहेत. पण आरटीओ, पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. परिवहन सेवा चांगली नसल्याने प्रवाशाला नाईलाजास्तव रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. परिणामी लूट डोळ््यासमोर दिसत असली तरी तो हतबल झालेला असतो. त्यातही चौथा प्रवासी, भंगार रिक्षातून प्रवास म्हणजे रोजच मृत्यूची टांगती तलवार घेऊनच तो ये-जा करत असतो. हा सर्व प्रकार राजकीय पक्षांच्या स्वयंघोषित नवीन रिक्षा चालक-मालक संघटनांच्या आशीर्वादाने सर्रास सुरू असतो.अलिकडे रिक्षाचालकांकडून महिलांचा विनयभंग होणे, महिला प्रवाशाला मारहाण करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातच ठाणे स्थानक परिसरात रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणाने अक्षरश: कळस गाठला आहे. त्यातच, घोडबंदरला जाणाºया प्रवाशांची ठाणे स्थानक परिसरातील सॅटीस पुलाखाली दिवसाढवळ््या रिक्षाचालकांकडून सर्रास लूट सुरू असते. पादचारी पुलाच्या ठिकाणी रिक्षाचालक घोळक्याने उभे असतात आणि आपले सावज शोधत असतात. वास्तविक ज्याठिकाणी हे रिक्षाचालक उभे असतात तेथून हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलिसांची शाखा आहे. फार कमीवेळी येथे पोलीस उभे असलेले दिसतात. रिक्षातळावरील प्रवाशांची मोठी रांग दाखवून बाहेरून आलेल्या प्रवाशाच्या मनात धडकी भरवतात. शहरात होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे मीटरनुसार गेलात तर २० रुपये अधिक द्यावे लागतील, अशी कारणे सांगत रिक्षाचालक प्रवाशांना ‘लक्ष्य’ करतात. उघडउघड ही फसवणूक सुरू आहे. फलाट क्रमांक १ आणि २ च्यामध्ये शिवाय दोनच्या मध्यभागी असलेल्या प्रवेशद्वारापाशी दिवसभर बेकायदा रिक्षा उभ्या करून चालक आपली शिकार शोधत असतात.
प्रवाशांना लुटणे हाच रिक्षाचालकांचा धंदा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:41 IST