- अनिकेत घमंडी, डोंबिवलीशहराला पूर्व-पश्चिम जोडणारा अवघा एक उड्डाणपूल असून त्यावरून अखंड वाहतूक सुरू असते. पश्चिमेला शास्त्रीनगर भागात तीन शाळा आहेत. त्यांचे शेकडो विद्यार्थी याच हमरस्त्यावरून ये-जा करत असतात. ट्रक, डम्पर यासह केडीएमटी, एनएमएमटी आणि अन्य वाहनांमुळे उड्डाणपुलाच्या उतारावरून येताना एखाद्या वेळेस वाहनाचा ब्रेक फेल झाल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्या ठिकाणी महापालिकेने संरक्षक भिंत बांधलेली नाही. नगरसेवकाने कागदी घोडे नाचवले, परंतु त्यास महापालिकेने प्रतिसाद दिलेला नाही. याच ठिकाणाहून वाशी/बेलापूर व अन्य ठिकाणी एनएमएमटीच्या तसेच केडीएमटीच्या बसेस जातात. हजारो प्रवासी त्याचा लाभ घेतात. मात्र, त्यांना उभे राहण्यासाठी चांगला बसथांबा नसल्याने प्रवाशांची आबाळ होते. परंतु, वॉर्डात केडीएमटी-परिवहन सेवा मात्र नागरिकांना मिळू शकलेली नाही. कचराकुंडीमुक्त वॉर्ड शक्य झाला नाही. त्यामुळे घंटागाडी येऊनही कचऱ्याची समस्या आहेच. परिसरात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढलेली असून त्यामुळेही नागरिक-वाहनचालक भयभीत आहेत. रात्री-अपरात्री एकटी व्यक्ती आढळल्यास अथवा वाहन जोराने नेल्यास कुत्री मागे लागतात. काही वेळेस चावाही घेतात. अशा स्थितीमुळे नागरिक त्रस्त आहेत. रेल्वे स्थानकालगतच हा परिसर येत असल्याने या ठिकाणी फेरीवाल्यांची समस्या जटील असून त्यावर नियंत्रण मिळवताना नगरसेवकाच्या नाकीनऊ आले आहे. ४-५ धोकादायक इमारती असून तेथे मालक-भाडेकरू यांच्यात समन्वयाचा अभाव असून नगरसेवक त्यात मध्यस्थी करू न शकल्याने समस्या जैसे थे आहे.याच परिसरात शास्त्रीनगर रुग्णालय आहे. ठिकठिकाणांहून पेशंट्स येत असल्याने त्यांनाही सुविधा मिळत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जातच नाहीत. काही ठिकाणची गटारे अद्यापही उघडी आहेत. या ठिकाणी पाण्याची, ड्रेनेजची समस्या सोडवली. ब्रीजच्या ठिकाणी संरक्षक भिंतीसंदर्भात एच वॉर्ड अधिकाऱ्यांना सांगितले, त्यांनी काही केलेले नाही. यूटीडब्ल्यूटीअंतर्गत रस्ता या ठिकाणी झाला. भटक्या कुत्र्यांची समस्या आहे. वाशी बसथांबा सुधारावा, यासाठी आधी माजी मंत्री गणेश नाईक यांनी निधी दिला होता. आता परिवहन सभापतींना साकडे घातले आहे. - रणजित जोशी, नगरसेवक
संरक्षक भिंत नाही; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By admin | Updated: September 11, 2015 01:02 IST