लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पावसाची संततधार आणि दुसरीकडे गेले अनेक दिवस कचरा उचलला न गेल्याने सूचकनाका परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कल्याण-शीळ रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याच परिसरातील महात्मा फुलेनगरमध्ये कचरा सर्वत्र पसरल्याने या भागाला दलदलीचे स्वरूप आले आहे. केडीएमसी कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे येथे रोगराई पसरण्याची भीती आहे. शहर स्वच्छता नामांकनात घसरण झाल्यानंतरही केडीएमसी हद्दीत जागोजागी कचऱ्याचे ढीग आहेत. पावसाळ्यात प्रामुख्याने साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यात स्वाइन फ्लूचा धोकाही वाढला आहे. परंतु, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मात्र कचरा वेळच्या वेळी उचलला जात नसल्याने स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे पाहावयास मिळत आहे. कल्याण पूर्वेकडील सूचकनाका येथील मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग गेले अनेक दिवस उचलले गेलेले नाहीत. महात्मा फुलेनगरमध्ये तर साफसफाई न झाल्याने या परिसराला घाणीचा विळखा पडला आहे.
सूचकनाका नव्हे कचरानाका
By admin | Updated: June 30, 2017 02:42 IST